Hardik Pandya: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026) मध्ये मुंबई इंडियन्सची (MI) खराब कामगिरी सुरूच आहे. पंजाब किंग्सने (PBKS) काल (16 एप्रिल) गुरुवारी मुंबई इंडियन्सला सात गडी राखून पराभूत करत दणका दिला. मुंबईला सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की, संघाला आता "काही कठीण प्रश्नांची उत्तरे देण्याची" आणि जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे. त्यामुळे आता पांड्याचा संताप कोणाला उद्देशून आहे याचीही चर्चा सुरु झाली आहे.
आम्हाला काही कठीण निर्णय घ्यायचे आहेत
सामन्यानंतर, पराभवाने निराश झालेल्या पांड्याने सांगितले की, "आम्हाला काही कठीण निर्णय घ्यायचे आहेत की नेहमीप्रमाणेच पुढे जायचे आहे, हे पाहावे लागेल. या प्रश्नांची उत्तरे आम्हाला द्यावी लागतील आणि त्यांची जबाबदारी घ्यावी लागेल. आम्हाला नव्याने विचार करून वैयक्तिकरित्या, एक संघ म्हणून किंवा आमच्या नियोजनात कुठे कमतरता आहे, हे समजून घ्यावे लागेल."
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना, मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 6 गडी गमावून 195 धावा केल्या. क्विंटन डी कॉकने 60 चेंडूंमध्ये शानदार नाबाद 112 धावा केल्या, परंतु त्याचे शतक विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. त्याने नमन धीरसोबत (50) 68 चेंडूंमध्ये 122 धावांची भागीदारी केली, तर कर्णधार पांड्याने (14) 23 चेंडूंमध्ये 41 धावा जोडल्या. गोलंदाजीमध्ये, अर्शदीप सिंगने 22 धावांत 3 बळी घेत प्रभावी कामगिरी नोंदवली, तर शशांक सिंगने एक बळी घेतला.
पंजाब किंग्सने लक्ष्य सहज गाठलं
प्रत्युत्तरात, पंजाब किंग्सने हे लक्ष्य सहज गाठले. प्रभसिमरन सिंग (39 चेंडूंत नाबाद 80 धावा) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (35 चेंडूंत 66 धावा) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 67 चेंडूंत 139 धावांची सामना जिंकणारी भागीदारी रचली आणि संघाला 16.3 षटकांत विजय मिळवून दिला. अल्लाह गझनफरने मुंबई इंडियन्ससाठी दोन बळी घेतले, पण ते अपुरे ठरले.
ती मुबंईची टीम होती, सेहवागनं मीठ चोळलं
दरम्यान, हार्दिक पांड्याच्या कामगिरीवरून टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने अत्यंत खोचक शब्दात टिप्पणी केली आहे. सेहवाग म्हणाला, मुंबई यापूर्वी तीन चार सामने हरत होती आणि कमबॅक करत होती. मात्र, ती रोहितची मुंबई होती, हार्दिक पांड्याची नाही. त्यामुळे कमबॅक कसं करायचं हा दबाव सुद्धा हार्दिकवर असल्याचे सेहवाग म्हणाला.
इतर महत्वाच्या बातम्या
