बर्मिंगहॅम (इंग्लंड) : इंग्लंडने टीम इंडियाचा दुसरा डाव 162 धावांत गुंडाळून एजबॅस्टन कसोटीत 31 धावांनी विजय साजरा केला. या विजयासह कसोटी मालिकेत इंग्लंडने भारतावर 1-0 ने आघाडी मिळवली आहे.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडचा हा एक हजारावा कसोटी सामना होता. त्यामुळे हजाराव्या कसोटी सामन्यात मिळालेला विजय ज्यो रूट आणि त्याच्या इंग्लिश आर्मीसाठी अविस्मरणीय ठरला.

या कसोटीत टीम इंडियासमोर विजयासाठी चौथ्या डावात 194 धावांचं लक्ष्य होतं. त्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतानं तिसऱ्या दिवसअखेर पाच बाद 110 धावांची मजल मारली होती.

जेम्स अँडरसननं दिनेश कार्तिकला चौथ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात माघारी धाडून इंग्लंडला झटपट सहावं यश मिळवून दिलं. त्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पंड्याच्या संघर्षाचा अपवाद वगळला, तर भारतीय फलंदाजांनी इंग्लिश आक्रमणासमोर सपशेल शरणागती स्वीकारली. विराटनं 51, तर हार्दिकनं 31 धावांची खेळी उभारली.