WTC Final 2025 Qualification Scenario : WTC फायनलच्या शर्यतीसाठी पुढील तीन-चार दिवस खूप महत्त्वाचे असणार आहेत. या दिवसांमध्ये 6 संघ कसोटी सामने खेळणार आहेत. न्यूझीलंड आणि श्रीलंका या दोन संघांसाठी हे सामने करो या मरो सारखे असणार आहेत. WTC फायनलच्या शर्यतीत राहण्यासाठी त्यांना कोणत्याही किंमतीवर जिंकणे आवश्यक आहे. श्रीलंकेचे गणित अजूनही इफ आणि बट्समध्ये अडकले असेल, पण न्यूझीलंड ड्रॉ खेळला तरी शर्यतीतून बाहेर पडेल. त्यामुळे भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसाठी हा आठवडा खूप महत्त्वाचा आहे.

गुरुवारपासून दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर अवघ्या काही तासांत न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरतील. तर भारत आणि ऑस्ट्रेलिया हे पण शुक्रवारपासून ॲडलेडमध्ये दुसरा कसोटी सामना खेळतील. या व्यस्त वेळापत्रकावरून कसोटी क्रिकेटची आवड असणाऱ्यांसाठी हा आठवडा किती रोमांचक असणार आहे, याचा अंदाज येऊ शकतो.

त्यामुळे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजेच WTC फायनलच्या शर्यतीत मोठा बद्दल होऊ शकतो. श्रीलंकेसाठी दक्षिण आफ्रिकेशी सामना हा करो या मरो असणार आहे. श्रीलंका जिंकल्यास शर्यतीत कायम राहील. श्रीलंकेचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दुसरी कसोटी हरला, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धची पुढील मालिका जिंकूनही तो 53.85 पीसीटी टक्केवारीच्या पुढे जाऊ शकणार नाही. फक्त 53.85 सह WTC फायनलमध्ये पोहोचणे खूप कठीण आहे. लंकेने आफ्रिकन संघासोबत ड्रॉ खेळल्यास त्यांची टक्केवारी 48.48 असेल.

दुसरीकडे इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर न्यूझीलंड संघ अडचणीत आला होता. सामन्यानंतर स्लो ओव्हररेटमुळे त्याचे 3 गुण कमी झाले. यामुळे न्यूझीलंडची गुणतालिकेत चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. आता न्यूझीलंडने उरलेले दोन्ही कसोटी सामने जिंकले तरी ते स्वबळावर WTC फायनलमध्ये पोहोचू शकणार नाही.

न्यूझीलंड-श्रीलंका व्यतिरिक्त भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका WTC फायनलच्या शर्यतीत आहेत. जर दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेला पराभूत केले तर त्याचे गुण (टक्केवारी) 63 पेक्षा जास्त होतील, त्यानंतर अंतिम फेरीतील त्याचा मार्ग अधिक सोपा होईल. आफ्रिकेचा संघ श्रीलंकेसोबत ड्रॉ खेळला तरी त्याचे टक्केवारी गुण 56.67 राहतील, ज्यामुळे ते अंतिम फेरीच्या शर्यतीत कायम राहतील.

भारत हरला तर काय होईल...

6 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला हरवले तर त्याचे टक्केवारी गुण 63.54 होईल. अशा परिस्थितीत डब्ल्यूटीसी फायनल खेळण्याचा त्यांचा दावा मजबूत राहील. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकल्यास भारताचे केवळ 57.29 टक्के गुण राहतील. अशा परिस्थितीत तो दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावरही घसरू शकतो. ऑस्ट्रेलिया पुन्हा 60.71 सह टॉप-2 मध्ये पोहोचेल. हा सामना अनिर्णित राहिल्यास भारताचे गुण 59.38 होतील आणि ते टॉप-2 मध्ये कायम राहतील.