World Cup 2019 Ind Vs SA | भारताची सलामीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी गाठ
एबीपी माझा वेब टीम | 05 Jun 2019 04:32 AM (IST)
टीम इंडियाला यंदाच्या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानलं जातं. पण विश्वचषकाचा बदललेला फॉरमॅट आणि इंग्लंडमधल्या ढगाळ वातावरणात खेळताना विराटसेनेचा कस लागणार आहे
मुंबई : विराट कोहलीच्या विश्वचषक मोहिमेला उद्यापासून सुरुवात होत आहे. सलामीच्या सामन्यात टीम इंडियाची गाठ फाफ ड्यू प्लेसीच्या दक्षिण आफ्रिकन संघाशी पडणार आहे. दक्षिण आफ्रिकन संघाच्या गोटात सध्या खेळाडूंच्या दुखापतींमुळे चिंतेचं वातावरण आहे. अशातच पहिले दोन्ही सामने हरल्यामुळे दक्षिण आफ्रिका बॅकफूटवर गेली आहे. त्यामुळे टीम इंडियाचं पारडं उद्याच्या सामन्यात जड मानलं जात आहे. साऊदम्पटनमधल्या रोज बाऊल स्टेडियमवर टीम इंडियाचा सलामीचा सामना रंगणार आहे. विराट कोहलीची टीम इंडिया आणि फाफ ड्यू प्लेसीची दक्षिण आफ्रिकन फौज विश्वचषकाच्या साखळी सामन्याच्या निमित्ताने आमनेसामने येणार आहेत. यासाठीच गेले काही दिवस साऊदम्प्टनमध्ये ठाण मांडून असलेल्या टीम इंडियाचा कसून सराव सुरु आहे. टीम इंडियाला यंदाच्या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानलं जातं. पण विश्वचषकाचा बदललेला फॉरमॅट आणि इंग्लंडमधल्या ढगाळ वातावरणात खेळताना विराटसेनेचा कस लागणार आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या गेल्या चार विश्वचषक स्पर्धांमध्ये भारताने 22 सामने खेळले आहेत. त्यात अकरा सामन्यात विजय आणि अकरा सामन्यात भारताला अपयश पचवावं लागलं. हा इतिहास पाहता टीम इंडियाचा ह्या विश्वचषकातला प्रवासही नक्कीच खडतर असेल. सलामीच्या सामन्यात लोकेश राहुलचं चौथ्या क्रमांकावर खेळणं जवळपास निश्चित आहे. पण सराव सामन्यात अपयशी ठरलेल्या रोहित शर्मा आणि शिखर धवनकडून मोठ्या खेळीची अपेक्षा राहील. कर्णधार विराट कोहली सुपर फॉर्ममध्ये आहे. त्याचा हा फॉर्म आणि अनुभवी महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या आणि गोलंदाजांचं योगदान यावरच टीम इंडियाची विश्वचषकातली कामगिरी अवलंबून राहील. दक्षिण आफ्रिकेचा यंदाच्या विश्वचषकातला हा तिसरा सामना आहे. याआधी इंग्लंड आणि बांगलादेशकडून दक्षिण आफ्रिकेला पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे विजयाचं खातं उघडण्यासाठी दक्षिण आफ्रिकेची फौजही उत्सुक असेल. एकूणच 1983 आणि 2011 नंतर टीम इंडिया तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. विश्वचषकाच्या या मोहिमेची सुरुवात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मोहिमेने होत आहे. त्यामुळे टीम इंडियाचे शिलेदार ही मोहिम कशी फत्ते करतायत हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल.