India vs Sri Lanka Asia Cup 2025 : आशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाचा विजयरथ कायम आहे. आधीच अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केलेल्या भारतीय संघाने सुपर-4 मधील शेवटच्या सामन्यात श्रीलंकेवर थरारक विजय मिळवला. हा सामना इतका चुरशीचा होता की निकाल सुपर ओव्हरवर जाऊनच ठरला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 202 धावा केल्या तर श्रीलंकेनेही तितक्याच धावा केल्या. त्यामुळे सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला. मात्र सुपर ओव्हर भारताने एकतर्फी जिंकला. श्रीलंकेला फक्त दोन धावांवर रोखल्यानंतर भारताने पहिल्याच चेंडूवर विजय मिळवला.
इतकं सगळं रामायण घडत असताना हार्दिक पांड्या कुठे गायब होता?
या आशिया कपमध्ये भारतीय संघासाठी हार्दिक पांड्या नवीन चेंडूने गोलंदाजी करतो आहे. जवळपास प्रत्येक सामन्यात त्याने पहिलं षटक टाकलं. श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यातही त्याने पहिल्या षटकात कुसल मेंडिसचा मौल्यवान विकेट घेतला. मात्र त्यानंतर संपूर्ण डावात तो पुन्हा गोलंदाजीसाठी आला नाही. श्रीलंकन फलंदाज तुफानी फटकेबाजी करत असताना कर्णधार सूर्यकुमार यादवने हार्दिककडे पाहिले पण नाही.
श्रीलंकेच्या डावातील पहिलं षटक टाकल्यानंतर लगेचच हार्दिक पांड्या मैदानाबाहेर गेला. त्याच्या जागी रिंकू सिंगने क्षेत्ररक्षण करण्यासाठी आला. हार्दिक पुन्हा मैदानावर आला नाही आणि त्यामुळेच सुपर ओव्हरमध्येही रिंकू सिंग मैदानात होता व त्याने कॅचही टिपला.
भारत हरायला आला तरी हार्दिक पांड्या मैदानात का परतला नाही? कोचने केला खुलासा
सामन्यानंतर भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांनी हार्दिक पांड्या मैदानाबाहेर जाण्याचे कारण स्पष्ट केले. क्रॅम्प्समुळे हार्दिकला संपूर्ण सामना बाहेर बसावे लागले. रविवारीच भारताला पाकिस्तानविरुद्ध आशिया कपचा अंतिम सामना खेळायचा आहे. जर हार्दिक पांड्या फिट नसेल, तर तो भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतो. हार्दिक पांड्या हा फिनिशर असण्यासोबतच नवीन चेंडूने गोलंदाजी पण करतो, त्यामुळे तो महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याला याआधी अनेकदा दुखापतींना सामोरे जावं लागलं आहे. बराच काळ तो दुखापतीमुळे गोलंदाजी करत नव्हता.
हे ही वाचा -