Virat Kohli Rohit Sharma : निवृत्ती घेतली आता 2027 चा वनडे विश्वचषक विसरा... विराट कोहली-रोहित शर्मावर सुनील गावसकर यांचं खळबळजनक वक्तव्य
टीम इंडियासाठी कसोटी आणि टी-20 मधून निवृत्त झालेले रोहित शर्मा आणि विराट कोहली आता फक्त एकदिवसीय स्वरूपात खेळताना दिसतील.

Sunil Gavaskar on Virat Kohli-Rohit sharma : टीम इंडियासाठी कसोटी आणि टी-20 मधून निवृत्त झालेले रोहित शर्मा आणि विराट कोहली आता फक्त एकदिवसीय स्वरूपात खेळताना दिसतील. अशा परिस्थितीत, माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनी असा दावा केला आहे की, हे दोघेही 2027 च्या विश्वचषकापर्यंत टीम इंडियाकडून खेळू शकणार नाहीत.
29 जून 2024 रोजी भारताने टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेला हरवून विजेतेपद पटकावल्यानंतर विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यावेळी कोणीही विचार केला नव्हता की एका वर्षाच्या आत विराट कोहली आणि रोहित शर्मा देखील कसोटी क्रिकेटला अलविदा म्हणतील.
पाच दिवसांतच रोहित-कोहलीने कसोटी क्रिकेटला दिला निरोप!
7 मे 2025 रोजी भारतीय कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला निरोप दिला आणि 5 दिवसांतच 12 मे 2025 रोजी, विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटला निरोप दिला. आता हे दोन्ही खेळाडू फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून खेळताना दिसतील. दरम्यान, सुनील गावसकर यांनी रोहित आणि कोहलीच्या एकदिवसीय भविष्याबाबत असा दावा केला आहे, जो क्रिकेट चाहत्यांना ऐकायला आवडणार नाही.
सुनील गावसकर यांनी रोहित आणि कोहलीवर केला मोठा दावा
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीनंतर सुनील गावसकर यांनी भाकीत केले होते की, पुढील एकदिवसीय विश्वचषकापर्यंत हे दोघेही टीम इंडियाचा भाग असतील असे त्यांना वाटत नाही. 2027 चा एकदिवसीय विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत खेळला जाणार आहे.
"रो-को 2027 चा एकदिवसीय विश्वचषक खेळू शकणार नाही..."
सुनील गावसकर एका चॅट शो दरम्यान म्हणाले, "खरं सांगायचं तर, मला वाटत नाही की ते (कोहली-रोहित) 2027 पर्यंत एकदिवसीय विश्वचषक खेळू शकतील. पण कोणाला माहित आहे, पुढच्या एक-दीड वर्षात, दोन्ही खेळाडू चांगले खेळले तर त्यांना कोणीच रोखू शकणार नाही, असा उल्लेखही यावेळी त्यांनी केला.
2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडियाचा झाला पराभव
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना अपराजित राहून खेळला, परंतु अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा 6 विकेट्सने पराभव केला आणि विश्वविजेते होण्याचे त्यांचे स्वप्न भंग केले. कोहलीने अलीकडेच एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, आता त्याचे फक्त एकच स्वप्न आहे, ते म्हणजे 2027 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकणे, तर रोहित शर्मा एकदिवसीय विश्वचषक हा खरा विश्वचषक मानतो.




















