Virat Kohli India vs England 2nd Test: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने (England vs India, 2nd Test) तब्बल 336 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलला (Shubhman Gill) या सामन्याचा सामनावीर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
भारतीय क्रिकेट संघाने तब्बल 58 वर्षांनंतर एजबेस्टन (Edgbaston) मैदानावर इंग्लंडचा पराभव केला. भारताच्या विजयावर माजी कसोटी कर्णधार विराट कोहलीचीही (Virat Kohli) प्रतिक्रिया समोर आली आहे. विराट कोहलीने एक्सवर पोस्ट करत भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे. तसेच भारताने इंग्लंडला निर्भयपणे खेळातून मागे ढकलले, असंही विराट कोहलीने म्हटले आहे. तसेच या विजयात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या तीन खेळाडूंची नावंही विराट कोहलीने पोस्टमध्ये घेतली आहे.
भारताच्या विजयानंतर विराट कोहली नेमकं काय म्हणाला?
विराट कोहलीने बऱ्याच दिवसांनंतर त्याच्या एक्स अकाउंटवर सामन्याशी संबंधित पोस्ट पोस्ट केली आहे. विराटने भारताच्या विजयावर तीन खेळाडूंची नावे घेतली. विराट कोहली म्हणाला की शुभमन गिलने त्याच्या फलंदाजीने आणि मैदानावर भारताची कमान उत्तम प्रकारे हाताळली. सर्वांनी उत्कृष्ट कामगिरी केली. विराटने पुढे लिहिले की विशेषतः मोहम्मद सिराज आणि आकाश दीपने या खेळपट्टीवर खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली.
टीम इंडियाने रचला इतिहास-
टीम इंडियाने सुमारे सहा दशकांत एजबॅस्टन मैदानावर विजय मिळवला आहे. या सामन्यात कर्णधार शुभमन गिलची सामनावीर म्हणून निवड झाली. दुसऱ्या कसोटीत शुभमन गिलने पहिल्या डावात द्विशतक आणि दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावले. या सामन्यात गिलने 430 धावा केल्या. आकाशदीपने या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात 10 विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजनेही भेदक गोलंदाजी केली आणि पहिल्या डावात 6 आणि दुसऱ्या डावात एक विकेट घेतली.