Virat Kohli Century Vijay Hazare Trophy 2025 : 24 डिसेंबरपासून देशातील प्रतिष्ठित देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा विजय हजारे ट्रॉफी 2025-26 ला शानदार सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी मैदानावर आणि क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. यंदाच्या हंगामात या स्पर्धेचे सर्वात मोठे आकर्षण ठरले आहे स्टार फलंदाज विराट कोहली. तब्बल 15 वर्षांनंतर कोहलीने विजय हजारे ट्रॉफीत पुनरागमन केले, तो आंध्र प्रदेशविरुद्ध दिल्ली संघाकडून खेळताना दिसला.
विराट कोहलीचा बॅट थांबायचं नावच घेत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा देशांतर्गत मैदान, 22 यार्डांच्या पट्टीवर पाऊल टाकताच विराट अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये आंध्र प्रदेशविरुद्ध विराट कोहलीने शतक झळकावत पुन्हा एकदा आपली बादशाही सिद्ध केली. अवघ्या 83 चेंडूमध्ये त्याने शतक पूर्ण केलं. तब्बल 15 वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीत खेळायला उतरलेल्या विराटने तब्बल 16 वर्षांनंतर या स्पर्धेत शतक ठोकले.
16 वर्षांनंतर विराट कोहलीचा तोच जलवा
विराट कोहलीने विजय हजारे ट्रॉफीत याआधी शेवटचं शतक 2009 साली झळकावलं होतं. हरियाणाविरुद्ध त्या सामन्यात त्याने 124 धावांची जबरदस्त खेळी केली होती. त्या संपूर्ण हंगामात विराटने 4 शतकांच्या जोरावर 534 धावा केल्या होत्या. आणि आता, तब्बल 16 वर्षांनंतर, विराटने पुन्हा एकदा या स्पर्धेत आपली जादू दाखवून दिली आहे.
मागील 4 वनडे डावांत ठोकले 3 शतक
त्यावेळी विराट कोहली शतकांवर शतकं ठोकत होता, तसंच रूप पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. विध्वंसक फॉर्ममध्ये आहे. विराटने आपल्या मागील 4 वनडे डावांत 3 शतकं झळकावली आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत सलग 2 शतकं ठोकल्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याने नाबाद 65 धावांची खेळी केली होती. आणि आता विजय हजारे ट्रॉफीतही शतक झळकावत त्याने पुन्हा एकदा विरोधी संघांना इशारा दिला आहे.
विजय हजारे ट्रॉफीत कोहलीच्या बॅटमधून पाचवं शतक
विराट कोहलीने विजय हजारे ट्रॉफीत पुन्हा एकदा आपली क्लास दाखवून दिली आहे. या स्पर्धेत आतापर्यंत कोहलीने एकूण 15 सामने खेळले असून, 68 पेक्षा जास्तच्या जबरदस्त सरासरीने त्याने 900 हून अधिक धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याच्या नावावर 5 शतकं आणि 3 अर्धशतकं ठोकली आहेत. या दमदार खेळी दरम्यान विराटने लिस्ट-A क्रिकेटमधील 16,000 धावांचा ऐतिहासिक टप्पाही पार केला. भारताकडून हा पराक्रम गाठणारा तो सचिन तेंडुलकर (21,999 धावा) यांच्यानंतर केवळ दुसरा फलंदाज ठरला आहे.
जबरदस्त फॉर्ममध्ये विराट कोहली
दिग्गज फलंदाज विराट कोहली यावर्षी भारताकडून वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने 13 सामन्यांत 65.10 च्या उत्कृष्ट सरासरीने आणि 96.15 च्या स्ट्राइक रेटने 651 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 3 शतकंही झळकावली. लिस्ट-A क्रिकेटमध्ये16,000 धावा पूर्ण करणारा कोहली नववा खेळाडू ठरला असून, तो आता ग्राहम गूच, ग्रीम हिक, सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा, सर विवियन रिचर्ड्स, रिकी पॉन्टिंग, गॉर्डन ग्रीनिज आणि सनथ जयसूर्या यांसारख्या महान खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे.
हे ही वाचा -
