U-19 Asia Cup 2025 India beats Sri Lanka by 8 wickets : भारतीय अंडर-19 संघाने अंडर-19 आशिया कप 2025 मध्ये दमदार कामगिरी करत थेट अंतिम फेरीत धडक मारली. दुबईतील आयसीसी अकॅडमी मैदानावर झालेल्या उपांत्य सामन्यात भारताने श्रीलंकेचा 8 विकेट्सने पराभव केला. पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला आणि अखेरीस तो 20-20 षटकांचा ठेवण्यात आला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेने 8 विकेट्स गमावून 138 धावा केल्या.

Continues below advertisement

भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा

भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच श्रीलंकेच्या फलंदाजांना बांधून ठेवलं. सलामीवीर दुल्निथ सिगेरा केवळ 1 धाव काढून बाद झाला, तर विरान चमुडिता 19 धावा करून तंबूत परतला. कविजा गमागे रनआऊट झाला. अवघ्या 28 धावांत 3 विकेट्स पडल्याने श्रीलंकेवर दबाव वाढला.

Continues below advertisement

कर्णधार विमत दिनसागे (34) आणि चामिका हीनातिगाला यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र 84 धावांत 6 विकेट्स पडल्या. सातव्या विकेटसाठी हीनातिगाला–सेनेविरत्ने जोडीने 52 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. हीनातिगाला सर्वाधिक 42 धावा करणारा ठरला. भारताकडून हेनिल पटेल आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

ना वैभव चमकला, ना आयुषची बॅट गरजली…, तरी शेवट जबरदस्त!

139 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. कर्णधार आयुष म्हात्रे (7) आणि वैभव सूर्यवंशी (9) लवकर बाद झाले. मात्र त्यानंतर विहान मल्होत्रा आणि आरोन जॉर्ज यांनी जबाबदारी घेत सामन्याचं चित्रच बदललं. विहानने 35 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत 45 चेंडूंमध्ये नाबाद 61 धावा केल्या. तर जॉर्जने 44 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करत 49 चेंडूंमध्ये नाबाद 58 धावा केल्या. 18व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चौकार मारत जॉर्जने भारताचा विजय निश्चित केला. विशेष उल्लेख अलीकडेच आयपीएल मिनी लिलावात आरसीबीकडून खरेदी करण्यात आलेल्या विहान मल्होत्राने आपल्या तडाखेबाज फलंदाजीने साऱ्यांचं लक्ष वेधलं.

अंतिम फेरीत भारत-पाकिस्तान सामना (U-19 Asia Cup 2025 India vs Pakistan Final)

दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव केला. त्यामुळे आता क्रिकेटप्रेमींना भारत विरुद्ध पाकिस्तान असा थरारक अंतिम सामना पाहायला मिळणार आहे. 

हे ही वाचा - 

Yuvraj Singh-Robin Uthappa : क्रिकेटविश्वात खळबळ! ED ने जप्त केली युवराज अन् उथप्पाची कोट्यवधींची मालमत्ता, नेमकं काय घडलं?