IND vs ZIM Series : भारतीय संघाने (Team India) इंग्लंड आणि वेस्ट इंडीजला त्यांच्याच भूमीत मात दिल्यानंतर आपली विजयी घोडदौड कायम ठेवत झिम्बाब्वेला (India vs Zimbabwe) व्हाईट वॉश दिला आहे. सोमवारी तिसऱ्या आणि मालिकेतील अखेरच्या सामन्यात 13 धावांनी विजय मिळवत भारताने सामना आणि मालिकाही जिंकली. मालिकेतील पहिली सामना 10 विकेट्सनी दुसरा सामना 5 विकेट्सनी आणि तिसरा सामना 13 धावांनी जिंकत मालिका 3-0 ने जिंकली आहे.






 


पहिल्या सामन्यात 10 विकेट्सने विजय


मालिकेतील पहिल्याच सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजी घेतली. ज्यानंतर 189 धावांवर झिम्बाब्वेला रोखत, भारताने हे लक्ष केवळ 30.5 षटकात पूर्ण करत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. आधी दीपक, अक्षर आणि प्रसिध यांच्या भेदक गोलंदाजीनंतर सलामीवीर शुभमन आणि शिखर दोघांनी अप्रतिम अशी अर्धशतकं झळकावत भारताचा विजय पक्का केला. 


दुसऱ्या सामन्यात 5 गडी राखून विजय


दुसऱ्या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या झिम्बाब्वेच्या संघानं निराशाजनक कामगिरी केली. या सामन्यात झिम्बाब्वेचा संघ 38.1 षटकांत 161 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात भारतानं 25.4 षटकात 5 विकेट्स गमावून 167 धावा करत सामना जिंकला. 


भारताने अखेरच्या सामन्यासह मालिका जिंकली


तिसऱ्या सामन्यात भारताने  सामन्यात आधी फलंदाजीवेळी शुभमन गिलचं (Shubhman Gill) दमदार असं शतक आणि गोलंदाजीत अखेरच्या षटकात शार्दूल, आवेश जोडीने केलेल्या भेदक माऱ्यामुळे भारत जिंकला आहे. सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजी घेतली. ज्यानंतर शुभमनच्या शतकाच्या जोरावर भारताने 290 धावांचे लक्ष्य झिम्बाब्वेला दिले. त्यानंतर झिम्बाब्वेचा अनुभवी फलंदाज सिकंदर रझा (Sikandar Raza) याने अप्रतिम शतक ठोकत साऱ्यांचीच मनं जिंकली. शतक ठोकत त्याने संघाला अगदी विजयाजवळ आणलं पण काही धावा कमी पडल्याने झिम्बाब्वे पराभूत झाला आहे.


हे देखील वाचा-