Team India loss toss 18th Consecutive Time : टीम इंडियाने शेवटचं वनडे सामन्यात नाणेफेक कधी जिंकली होती, आठवतंय का? जर तुम्ही हे शोधायला गेलात तर आश्चर्य वाटेल. कारण जवळपास दोन वर्षांपासून भारतीय संघ वनडे क्रिकेटमध्ये टॉसच जिंकलेला नाही. तब्बल 23 महिने, 18 वनडे सामने आणि दोन वेगवेगळे कर्णधार झाले, पण टीम इंडियाचं नशीब मात्र जसंच्या तसं आहे. टीम इंडियाने शेवटचा टॉस 15 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबईच्या वानखेडे मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड कप 2023 च्या सेमीफायनलमध्ये जिंकला होता. त्यानंतर आज दिनांक 25 ऑक्टोबर 2025 आली, पण भारताला वनडे सामन्यात टॉस जिंकता आलेला नाही. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत देखील भारत तिन्ही वेळा टॉस हरला आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सुरू झालेलं हे टॉस हरायची मालिका आता शुभमन गिलच्या कर्णधारपदातही कायम आहे. रोहितने सलग 15 टॉस वनडे क्रिकेटमध्ये गमावले, आणि आता गिलच्या नेतृत्वाखाली देखील भारत 3 टॉस हरला आहे. तरीही एक दिलासादायक बाब म्हणजे या काळात भारताने एक आयसीसी स्पर्धा जिंकली, ती म्हणजे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2015. गंमत म्हणजे, त्या स्पर्धेतही भारताला एकदाही टॉस जिंकता आला नव्हता.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली, टीम इंडियाच्या प्लेइंग-11मध्ये 2 मोठे बदल
ऑस्ट्रेलियाचे कर्णधार मिचेल मार्श याने भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने त्यांच्या प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला असून जेव्हियर बार्टलेटच्या जागी केन एलिस याची संघात पुनरागमन झाले आहे. तर दुसरीकडे, टीम इंडियाने दोन बदल केले आहेत. कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संघात स्थान देण्यात आले आहे. हे दोघे नीतीश रेड्डी आणि अर्शदीप सिंग यांच्या जागी अंतिम अकरामध्ये समाविष्ट झाले आहेत.
भारतीय संघाची प्लेइंग-11 : रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग-11 : मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मॅट रेनशॉ, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), कूपर कॉनोली, मिचेल ओवेन, नाथन एलिस, मिचेल स्टार्क, अॅडम झांपा, जोश हेझलवुड.
हे ही वाचा -
