India beat Bangladesh Asia Cup 2025 : आशिया कप 2025 च्या सुपर फोरमधील महत्त्वाच्या सामन्यात भारताने तूफानी कामगिरी करत बांगलादेशचा पराभव केला आणि थेट फायनलमध्ये प्रवेश केला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची या आशिया कप 2025 मध्ये चांगली कामगिरी राहिली आहे. टीम इंडियाच्या विजयाचे हिरो अभिषेक शर्मा आणि कुलदीप यादव होते, ज्यांनी फलंदाजी आणि गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली.

Continues below advertisement

दुबईत अभिषेक शर्मा अन् शुभमन गिलच्या वादळी खेळीनंतर 168 स्कोर उभारला. नंतर गोलंदाजीत कुलदीप यादवने उत्कृष्ट मारा करत बांगलादेशी फलंदाजांना रोखून 127 धावांवर रोखले. या विजयामुळे भारताने आशिया कप 2025 च्या अंतिम फेरीत जागा पक्की केली असून पुन्हा एकदा विजेतेपद पटकावण्याची संधी आहे. भारतीय संघ आता 26 सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध शेवटचा सुपर 4 फेरीचा सामना खेळणार आहे.

Continues below advertisement

अभिषेक शर्मा अन् शुभमन गिलचं वादळ 

बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सुरुवातीच्या तीन षटकांत बांगलादेश गोलंदाजांनी चांगलाच जोर दाखवला आणि स्कोअर फक्त 17 धावांवर रोखून धरला. पण चौथ्या षटकात तब्बल 21 धावा फटकावत भारताने लय पकडली. पहिले 3 षटके 17 धावा वरून पुढची 3 षटके गिल आणि अभिषेकच्या जोरावर तब्बल 55 धावा केल्या. असं करीत टीम इंडियाने पॉवरप्ले संपेपर्यंत एकही विकेट न गमावता 72 धावा केल्या. मात्र गिलला मिळालेली चांगली सुरुवातीनंतर तो 29 धावांवर माघारी परतला.

पुन्हा शतकापासून वंचित राहिला अभिषेक शर्मा

पाकिस्तानविरुद्ध 74 धावांची खेळी साकारल्यानंतर अभिषेक शर्मा पुन्हा एकदा शतकाच्या उंबरठ्यावर थांबला. बांगलादेशविरुद्ध त्याने अवघ्या 25 चेंडूत अर्धशतक झळकावलं आणि दमदार 75 धावांची खेळी केली, पण तो दुर्दैवाने रनआऊट झाला. अभिषेकच्या विकेटनंतर भारतीय संघाची धावगती पण घसरली. तो  12व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर माघारी परतला आणि त्यानंतर पाच षटकांत केवळ 23 धावा जमल्या. शेवटच्या षटकांत हार्दिक पांड्याने तुफानी फटकेबाजी करत भारताचा डाव 160 धावांपलीकडे नेला. 

गोलंदाजांनी जिंकवला सामना

भारतीय संघाची ओळख जरी दमदार फलंदाजीसाठी असली तरी बांगलादेशविरुद्धची विजयगाथा ही गोलंदाजांनीच लिहिली. जसप्रीत बुमराहने आपल्या पहिल्याच षटकात भारताला पहिली यशस्वी झळ दिली. मात्र, मधल्या षटकांमध्ये वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी सामन्याचा भारताकडे वळवला. चक्रवर्तीने 2 तर कुलदीप यादवने 3 बळी घेतले. या दोघांनी मिळून 8 षटकांत फक्त 47 धावा देत बांगलादेशचे तब्बल पाच गडी बाद केले. त्यांचा हा स्पेल बांगलादेशसाठी घातक ठरला आणि अखेरीस भारताने 41 धावांनी सामना आपल्या नावावर केला.

आशिया कपमध्ये भारताचा दबदबा

आशिया कपमध्ये भारतीय संघाने सातत्याने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तब्बल 12व्यांदा संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला असून यापैकी 8 वेळा आशिया कपचं विजेतेपद पटकावलं आहे. भारताने 1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016, 2018 आणि 2023 या वर्षांत आशिया कप जिंकला आहे.

हे ही वाचा -

Abhishek Sharma : चौकार-षटकारांचा पाऊस, पण सूर्याच्या चुकीमुळे अभिषेक शर्माचं शतक हुकलं; नेमकं काय घडलं; VIDEO एकदा पाहाच