Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडियाने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत 2026 चा टी-20 विश्वचषक आपल्या नावावर केला. या विजयासह भारताने तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवला. अहमदाबादमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला नमवत भारताने केवळ ट्रॉफी जिंकली नाही, तर टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात अनेक नवे विक्रमही रचले. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या स्पर्धेत अभूतपूर्व कामगिरी करत इतिहास घडवला.

Continues below advertisement

Continues below advertisement

विश्वचषक जिंकला… अन् सूर्या झाला भावुक!

या ऐतिहासिक विजयाच्या क्षणी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव मात्र भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. विजयाचा आनंद साजरा करताना सूर्यानं अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या मैदानाची माती उचलून ती कपाळावर लावली आणि मैदानाला सलाम केला. या भावनिक क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सलग दोनदा टी-20 विश्वचषक जिंकणारा पहिला संघ

टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात यापूर्वी कोणत्याही संघाला आपले विजेतेपद राखता आले नव्हते. मात्र, 2026 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर मात करत टीम इंडियाने हा विक्रम मोडला. भारत आता सलग दोन वेळा टी-20 विश्वचषक जिंकणारा जगातील पहिला संघ ठरला आहे.

टी-20 विश्वचषक जिंकणारा पहिला यजमान देश

या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे होते आणि घरच्या मैदानावर खेळताना भारतीय संघाने इतिहास रचला. आतापर्यंत कोणत्याही यजमान देशाला टी-20 विश्वचषक जिंकता आला नव्हता. मात्र, न्यूझीलंडचा पराभव करत भारताने हा अडथळाही दूर केला आणि यजमान देश म्हणून टी-20 विश्वचषक जिंकणारा पहिला संघ बनला.

टी-20 विश्वचषकात न्यूझीलंडवर पहिलाच विजय

टी-20 विश्वचषकात भारताला यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध कधीही विजय मिळवता आला नव्हता. 2007, 2016 आणि 2021 या स्पर्धांमध्ये न्यूझीलंडने भारतावर मात केली होती. मात्र, 2026 च्या अंतिम सामन्यात भारताने शानदार विजय मिळवत हा किवी जादू अखेर मोडून काढला. दोन्ही संघांमधील टी-20 विश्वचषकातील हा चौथा सामना होता आणि यात भारताने पहिल्यांदाच बाजी मारली.

हे ही वाचा - 

Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला