Suryakumar Yadav India vs Pakistan T20 World Cup 2026 : टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध करत शानदार विजय नोंदवला. कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव करत स्पर्धेतील विजयाची मालिका कायम ठेवली. सामन्यानंतर चाहत्यांकडून जल्लोष सुरू असतानाच कर्णधार सूर्यकुमार यादवच्या सोशल मीडियावरील पोस्टने विशेष लक्ष वेधले.
कर्णधाराची पोस्ट चर्चेत (Suryakumar Yadav Instagram Post Viral)
सामना संपल्यानंतर सूर्यकुमार यादवने इंस्टाग्रामवर संघासोबतचे काही फोटो शेअर केले. त्या फोटोला त्याने फक्त 3 शब्दांचा कॅप्शन दिला, ‘हर हर महादेव’. या पोस्टनंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला. अनेक चाहत्यांनी संघाच्या रणनीतीचे कौतुक केले, तर काहींनी या विजयाचा आनंद उत्साहात व्यक्त केला.
पाकिस्तानविरुद्ध सर्वात मोठी धावसंख्या
प्रथम फलंदाजी करताना भारताने टी-20 विश्वचषकांच्या इतिहासातील पाकिस्तानविरुद्ध सर्वात मोठी धावसंख्या उभारली. ईशान किशन याने 77 धावांची दमदार खेळी साकारत डाव सावरला. मधल्या फळीत तिलक वर्मा, शिवम दुबे आणि रिंकू सिंह यांनी वेगाने धावा जमवत संघाचा स्कोर 175 पर्यंत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली.
गोलंदाजांचा कहर
175 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवातच डळमळीत झाली. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांनी सुरुवातीच्या षटकांतच तीन महत्त्वाच्या विकेट घेत पाकिस्तानला जबर धक्का दिला. सतत पडणाऱ्या विकेट्समुळे पाकिस्तानचा डाव सावरू शकला नाही आणि अखेर संपूर्ण संघ 114 धावांवर गुंडाळला गेला.
कर्णधाराचे वक्तव्य
सामन्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाले की, या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरला. त्याच्या मते, या विकेटवर 155 धावाही स्पर्धात्मक ठरल्या असत्या, मात्र 175 धावा करून संघाने स्पष्ट आघाडी मिळवली.
ईशान किशनच्या खेळीचे त्याने विशेष कौतुक करत सांगितले की, सुरुवातीचे विकेट पडल्यावर जबाबदारी घेणारा फलंदाज आवश्यक होता आणि ईशानने ती भूमिका उत्कृष्टरीत्या निभावली. या विजयासह भारताने सुपर-8 फेरीतील आपली दावेदारी अधिक भक्कम केली आहे. आता सर्वांचे लक्ष पुढील सामन्याकडे लागले आहे.
हे ही वाचा -
