India vs West Indies, 2nd Test : भारताने वेस्ट इंडिजवर दुसऱ्या कसोटीत 7 गडी राखून विजय (Team India beat West Indies 2nd Delhi Test) मिळवत मालिकेत 2-0 अशी जिंकली. ही शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वाखालील टीम इंडियाची पहिली मालिका विजय ठरली. त्यामुळे गिल आनंदी आणि भावूक दिसला, आणि तसं होणं साहजिकच होतं. कारण भारतात पहिल्याच मालिकेत कर्णधार म्हणून मिळालेला हा ऐतिहासिक विजय त्याच्यासाठी नक्कीच अविस्मरणीय आहे. आता शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया ऑस्ट्रेलिया (India vs Australia) दौऱ्यावर जाणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसतील. याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

सामना संपल्यावर शुभमन गिल काय म्हणाला?

शुभमन गिल म्हणाला, “भारताचे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी एक मोठी सन्मानाची बाब आहे. या संघातील प्रत्येक खेळाडूला समजून घेणे, त्यांना साथ देणे आणि संघाचे नेतृत्व करणे हे खरोखर अभिमानास्पद आहे. आता मला त्याची सवय झाली आहे. मी नेहमी परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो आणि काही वेळा धाडसी निर्णय घ्यावे लागतात. असा निर्णय त्या खेळाडूवर अवलंबून असतो जो संघासाठी महत्त्वाच्या धावा करू शकतो किंवा निर्णायक विकेट्स मिळवू शकतो.”

दिल्लीत शुभमन गिलचा मास्टरस्ट्रोक

शुभमन गिल म्हणाला की, “आम्ही जवळपास 300 धावांनी आघाडीवर होतो. आम्हाला वाटले की जरी आम्ही आमची आघाडी वाढवून 500 धावा केल्या असत्या, तरी पाचव्या दिवशी 6-7 विकेट्स घेणे आमच्यासाठी अवघड ठरले असते. नितीश कुमार रेड्डीला या सामन्यात गोलंदाजीची फारशी संधी मिळाली नाही, त्यामुळे आम्हाला त्याला संधी द्यायची होती. आम्ही फक्त खेळाडूंना परदेशात खेळवण्यावर विश्वास ठेवत नाही, कारण त्यामुळे त्यांच्यावर अनावश्यक दबाव येतो. आमचा उद्देश असे खेळाडू तयार करण्याचा आहे जे भविष्यात परदेशात जाऊन सामने जिंकण्यात आमची ताकद वाढवू शकतील, कारण ते आमच्यासाठी खरे आव्हान आहे.”

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने यशस्वी जैसवाल आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या शतकी खेळीच्या जोरावर 518 धावांचा डोंगर उभारला आणि पहिली डाव घोषित केला. प्रत्युत्तर वेस्ट इंडिजचा पहिला डाव केवळ 248 धावांवर आटोपला.

मालिकेत वेस्ट इंडिजची फलंदाजी आतापर्यंत निराशाजनक राहिल्याने भारताने त्यांना फॉलोऑन दिला. मात्र, फॉलोऑन मिळाल्यानंतर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी पुनरागमन करत 390 धावा करत भारतावर आघाडी मिळवली. शेवटी वेस्ट इंडिजने भारतासमोर 121 धावांचे लक्ष्य ठेवले, जे टीम इंडियाने सहज गाठत दुसऱ्या कसोटीत 7 गडी राखून विजय मिळवला.