Shubman Gill Post After Team India Loss South Africa 2nd Test : भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत लाजिरवाणा क्लीन स्वीपचा सामना करावा लागला. कोलकात्यातील ईडन गार्डन्समध्ये झालेल्या पहिल्या कसोटीमध्ये टीम इंडियाचा 30 धावांनी पराभव झाला, तर गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत तब्बल 408 धावांनी शर्मनाक हार पत्करावी लागली. 2024 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर क्लीन स्वीप झाल्यानंतर अवघ्या एका वर्षात भारतीय संघाला पुन्हा एकदा कसोटी मालिकेत 0-2 ने हार मानावी लागली आहे.
गौतम गंभीरवर मोठ्या प्रमाणात टीका
यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे. प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर घरच्या कसोटी मालिकेत भारताचा व्हाईटवॉश होण्याची ही दुसरी वेळ आहे. भारताच्या मालिकेतील पराभवानंतर आणि गंभीरवर झालेल्या टीकेदरम्यान आता कसोटी कर्णधार शुभमन गिलचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.
"आम्ही एकमेकांसाठी लढत राहू..."- शुभमन गिल
कोलकाता कसोटीदरम्यान नेक स्ट्रेन जाणवल्यामुळे शुभमन गिल अर्ध्यातच मालिकेबाहेर गेला होता. त्यानंतर तो गुवाहाटी कसोटीच्या संघातही नव्हता. मालिकेनंतर गिल याने एक्स (Twitter) वर लिहिले की “शांत समुद्र तुम्हाला मार्ग दाखवत नाही, पण वादळ तुम्हाला अधिक मजबूत बनवतं. आम्ही एकमेकांवर विश्वास ठेवत राहू, एकमेकांसाठी लढत राहू आणि अधिक ताकदीनं परतू.” 25 वर्षांनंतर पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेने भारताला घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत क्लीन स्वीप केले आहे, ही बाब त्यामुळे अधिक धक्का देणारी ठरते.
टी20 मालिकेत गिलच्या पुनरागमनाची चिन्हे
कसोटी मालिकेदरम्यान दुखापत झाल्यामुळे गिलचा वनडे मालिकेसाठीच्या संघात समावेश करण्यात आला नाही. 30 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत केएल राहुल संघाचे नेतृत्व करणार आहे. पुढील पाच सामन्यांची टी20 मालिका जाहीर व्हायची आहे आणि त्यात शुभमन गिल पुनरागमन करू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील कसोटी मालिका खेळण्यासाठी भारताला आता बराच काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हे ही वाचा -