R Ashwin Team India World Cup 2027 : भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने 2027 च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2027 संदर्भात एक धक्कादायक मत व्यक्त केले आहे. भारताचा सध्याचा वनडे कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्याचा सल्ला देत अश्विनने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याच्या मते, या स्पर्धेत भारतासाठी डावाची सुरुवात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी करावी. मात्र गिलला कोणत्या क्रमांकावर खेळवायचे याबाबत अश्विनने काहीही स्पष्ट केले नाही.

रोहित-विराट ओपनिंग, ऋतुराज नंबर 3…

रोहित आणि विराटची सध्याची उत्कृष्ट फॉर्म पाहता या दोघांनीच 2027 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी ओपनिंग करावी, अशी इच्छा अश्विनने व्यक्त केली. आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना तो म्हणाला, “डावाची सुरुवात नेमकी कोण करेल हे मला माहीत नाही, पण माझ्या मते विराट कोहली का नाही? विराट टी-20 मध्ये ओपनिंग करू शकतो, तर वनडेमध्ये का नाही? तो रोहितसोबत डावाची सुरुवात करताना पाहायला मला नक्कीच आवडेल.”

2024 च्या आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2024 मध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी भारतासाठी ओपनिंग केली होती. मात्र वनडे फॉरमॅटमध्येही जर हीच जोडी कायम ठेवायची असेल, तर शुभमन गिलला संघाबाहेर बसावे लागू शकते. विशेष म्हणजे, टॉप-4 फलंदाजांची निवड करताना अश्विनने गिलचे नावही घेतले नाही.

ऋतुराज नंबर 3 साठी योग्य पर्याय...

अश्विनच्या मते, जर विराट आणि रोहित ओपनिंग करत असतील, तर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हे अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतात.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत ऋतुराज गायकवाडने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र उपकर्णधार श्रेयस अय्यरच्या पुनरागमनानंतर त्याला पुढील मालिकेतून बाहेर बसावे लागले. गायकवाड हा ओपनिंगसह मिडल ऑर्डरमध्येही फलंदाजी करू शकतो, त्यामुळे अश्विनसारख्या क्रिकेट विश्लेषकांच्या मते तो संघासाठी अधिक उपयुक्त पर्याय ठरू शकतो.

हे ही वाचा -

Kuldeep Yadav-Vanshika Chadha : लाल रंगाचा लेहंगा, दोन पावलं चालली अन्...; कुलदीप यादवची नवरी नखशिखान्त नटली; पाहा लग्नाचे 10 अनसीन फोटो