Pakistan T20 World Cup 2026 : टी-20 विश्वचषक 2026 मधील अत्यंत निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) ने कठोर पाऊल उचलत संघातील प्रत्येक खेळाडूवर 50 लाख पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम खेळाडूंच्या पगार आणि मॅच फीमधून थेट वसूल केली जाणार आहे.
सलग चौथ्या आयसीसी स्पर्धेत अपयश
पाकिस्तान संघ यंदा उपांत्य फेरीतही पोहोचू शकला नाही. सलग चौथ्या आयसीसी स्पर्धेत अंतिम चारमध्ये स्थान न मिळाल्याने चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. सुपर-8 टप्प्यातूनच बाहेर पडणे हा संघासाठी मोठा धक्का मानला जातो.
सुरुवात तुफानी, पण मोठ्या सामन्यांत अपयश
पाकिस्तानने स्पर्धेची सुरुवात नेदरलँड्सविरुद्ध 3 विकेट्सने जिंकून केली. त्यानंतर अमेरिकेविरुद्ध 32 धावांनी विजय मिळवला. मात्र मोठ्या सामन्यांत संघ कोसळला. पाकिस्तानला भारताविरुद्ध 61 धावांनी पराभव पत्करावा लागला, ज्यामुळे त्यांचा वेग मंदावला. सुपर आठमध्ये पोहोचल्यानंतरही त्यांच्या कामगिरीत सुधारणा झाली नाही. न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे वाया गेला, तर इंग्लंडच्या दोन विकेट्सने विजयामुळे पाकिस्तानसाठी परिस्थिती कठीण झाली. श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवूनही, खराब नेट रन रेटमुळे त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.
पीसीबीचा कडक संदेश
पाकिस्तान क्रिकेट बोर्डने प्रत्येक खेळाडूवर 50 लाख पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम पाकिस्तानातील अनेक क्रिकेटपटूंसाठी खूप मोठी मानली जाते. आधीच खराब कामगिरीमुळे टीकेचा भडिमार सहन करावा लागत असताना आता आर्थिक फटका बसणार असल्याने खेळाडूंवर दुहेरी दबाव निर्माण झाला आहे. PCB चा हा निर्णय त्यांच्या नव्या धोरणाचा भाग मानला जात आहे. कामगिरी थेट आर्थिक अटींशी जोडण्याचा हा स्पष्ट संदेश आहे, परिणाम नसेल, तर किंमत मोजावी लागेल. पाकिस्तान क्रिकेटमध्ये खराब निकालांनंतर कारवाई होण्याची ही पहिली वेळ नाही. मात्र इतक्या मोठ्या रकमेत थेट वसुली करण्याचा निर्णय क्वचितच पाहायला मिळतो. (Pakistan T20 World Cup 2026 Marathi News)
हे ही वाचा -
