Abrar Ahmed on Shikhar Dhawan : आशिया कप 2025 दरम्यान भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak Asia Cup 2025) यांच्यातील सामना फक्त मैदानापुरता मर्यादित राहिला नाही, तर त्याबाहेरही तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर चांगलीच शाब्दिक चकमक रंगली होती. या आशिया कपमघ्ये पाकिस्तानी खेळाडूंची हेकडी आणि वादग्रस्त वर्तन चर्चेचा विषय बनलं. कधी ‘हँडशेक’ न केल्याने वाद पेटला, तर कधी विकेट घेतल्यानंतर केलेल्या ‘प्लेन क्रॅश’ सेलिब्रेशनमुळे पाकिस्तानवर टीकेची झोड उठली. या सर्व घटनांनी दोन्ही संघांमधील वैर आणखी तीव्र झालं. फायनलमध्येही पाकिस्तानला भारताकडून पराभव पत्करावा लागला, आणि त्यानंतर पाकिस्तानचा संपूर्ण संघ चर्चेचा विषय ठरला.

Continues below advertisement

आता स्पर्धा संपली असली तरी त्या कटुतेचा परिणाम अजूनही दिसून येतो आहे. नुकतंच पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार अहमदने (Abrar Ahmed) एका भारतीय दिग्गज खेळाडूबद्दल वादग्रस्त विधान केलं असून, त्याच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.

अबरार अहमदने पेटवला वाद? (Abrar Ahmed Controversial Statement)

अबरार अहमदने अलीकडेच एक वादग्रस्त विधान करून सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्याने म्हटले की, त्याला भारताचा माजी सलामीवीर शिखर धवन याच्यासोबत बॉक्सिंग करायची आहे. एका मुलाखतीदरम्यान जेव्हा त्याला विचारले गेले की, “जगात कोणत्या खेळाडूसोबत तू बॉक्सिंग करायला आवडेल? कोणावर जास्त राग येतो?” तेव्हा त्याने उत्तर दिले, “मला बॉक्सिंग करायचं आहे आणि माझ्यासमोर शिखर धवन (Shikhar Dhawan) उभा असावा.” या विधानानंतर चांगलीच खळबळ उडाली आहे.

शिखर धवन सोशल मीडियावर चर्चेत

भारताचा माजी डावखुरा सलामीवीर शिखर धवन 2025 च्या सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरला होता. सुरुवातीला त्याचे पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याच्यासोबत सोशल मीडियावर शब्दयुद्ध झाले होते. त्यानंतर धवनने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळण्यास नकार दिला होता. त्या पाकिस्तानी संघात शाहिद आफ्रिदीसह अनेक दिग्गज खेळाडू होते.

भारतीय खेळाडूंनी अबरार अहमदच्या अंदाजातच उडवली खिल्ली

अबरार अहमदने अलीकडे झालेल्या आशिया कपमध्ये तसेच वर्षाच्या सुरुवातीला पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानकडून प्रतिनिधित्व केले होते. त्याचदरम्यान घेतलेल्या एका मुलाखतीत त्याने हे वादग्रस्त वक्तव्य केल्याने तो चर्चेत आला आहे. 28 सप्टेंबरला झालेल्या अंतिम सामन्यात विजयानंतर भारतीय खेळाडूंनी अबरार अहमदच्या अंदाजातच त्याची खिल्ली उडवली होती. संपूर्ण आशिया कप 2025 स्पर्धेत पाकिस्तानचे प्रदर्शन अत्यंत सामान्य राहिले. पाकिस्तानला भारताकडून सलग तीन रविवारी पराभवाचा सामना करावा लागला, 14 सप्टेंबरला गट फेरीत, 21 सप्टेंबरला सुपर-4 मध्ये आणि अखेर 28 सप्टेंबरला अंतिम सामन्यात पराभव झाला. ही पहिलीच वेळ होती, जेव्हा आशिया कपच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले. आशिया कप 2025 ही स्पर्धा म्हणून नाही, तर भारत-पाकिस्तान खेळाडूंमध्ये झालेल्या वादासाठी अधिक लक्षात राहील.

हे ही वाचा -

INDW vs PAKW: पाकिस्तानच्या नशराने डोळे वटारले, हारिस रौफसारखी नडली, हरमनप्रीत कौरने काय केलं?, VIDEO