नवी दिल्ली : भारतानं संयुक्त अरब अमिरात मध्ये झालेल्या आशिया चषकावर पाकिस्तानला पराभूत करत नाव कोरलं. भारतानं आशिया कपमध्ये तीन वेळा पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. अंतिम सामन्यात भारतानं 5 विकेटनं विजय मिळवल्यानंतर आशिया चषकाची ट्रॉफी मिळणं अपेक्षित असताना आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन निघून गेले. त्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि भारताच्या खेळाडूंनी ट्रॉफीशिवाय विजयाचा जल्लोष केला. तेव्हापासून मोहसीन नक्वी वादात अडकले आहेत. वादात अडकलेल्या मोहसीन नक्वी याना पाकिस्तानात विशेष सुवर्ण पदक जाहीर करण्यात आलं आहे.
Mohsin Naqvi to get award : मोहसीन नक्वीला पुरस्कार जाहीर
पाकिस्तानचे मंत्री आणि पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी सध्या आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत. फायनलनंतर ट्रॉफी पळवून नेल्यानं ते वादात अडकले आहेत. या वादात भारताच्या भूमिकेच्या विरोधात ठामपणे भूमिका घेतल्याचा दावा करत नक्वीला पाकिस्तानात विशेष सुवर्ण पदक जाहीर झालं आहे.
द नेशनच्या वृत्तानुसार मोहसीन नक्वीला शहीद झुल्फिकार अली भुट्टो एक्सीलेन्स गोल्ड मेडल कराचीत दिलं जाणार आहे. आशिया कपच्या फायनलमध्ये भारताच्या भूमिकेविरुद्ध ठाम भूमिका घेतल्याचा दावा करत हा पुरस्कार जाहीर केला गेला आहे. कराची बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गुलाम अब्बास जलाम यांच्या तर्फे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार कराचीत दिला जाणार आहे. या कार्यक्रमाला बिलावल भुट्टो झरदारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
ट्रॉफी देण्यास तयार.. पण अट टाकली
आशिया क्रिकेट परिषदेचा चेअर म्हणून मोहसीन नक्वीनं बुधवारी भारतीय संघाचं आशिया चषकाची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी स्वागत आहे. ही ट्रॉफी आशिया क्रिकेट परिषदेच्या दुबईतील कार्यालयातून घ्यावी, असं नक्वीनं म्हटलं.
मोहसीन नक्वीनं आशिया क्रिकेट परिषदेच्या वार्षिक बैठकीत बीसीसीआयची माफी मागितल्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. एसीसीचा अध्यक्ष म्हणून ट्रॉफी देण्यास तयार आहे, मी आता देखील तयार आहे,असं नक्वीनं म्हटलं.
दरम्यान, आशिया चषक 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान तीन वेळा आमने सामने आले होते. ग्रुप स्टेजमध्ये भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदा एकमेकांविरोधात खेळले. भारतानं पहिल्या सामन्यात विजय मिळवला. यांनतर सुपर 4 मध्ये भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानला दणका दिला. अंतिम फेरीत भारतानं पाच विकेटनं विजय मिळवला. भारताचं नो हँडशेक धोरण, सूर्यकुमार यादवची पीसीबीनं केलेली तक्रार, साहिबजादा फरहान, हॅरिस राऊफच्या वादग्रस्त कृतीनं स्पर्धा चर्चेत राहिली.