India vs South Africa Test Series Squad 2025 : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची (India Test Squad vs South Africa 2025) घोषणा करण्यात आली आहे. मात्र या घोषणेनंतर सगळ्यांत जास्त चर्चा होतेय ती वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची. कारण पुन्हा एकदा त्याला टीम इंडियात स्थान देण्यात आलेले नाही. शमी सध्या रणजी ट्रॉफीत (Ranji Trophy 2025) बंगालकडून खेळत असून तिथे त्याने अफलातून गोलंदाजी केली आहे. तरीदेखील त्याला कसोटी संघात स्थान न मिळाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
तीन सामन्यात 15 विकेट्स… तरी मोहम्मद शमीला डच्चू!
शमीने रणजी ट्रॉफीतील शेवटच्या तीन सामन्यांत एकूण 15 विकेट्स घेतले. उत्तराखंडविरुद्धच्या सामन्यात तर त्याने एकट्याने 7 विकेट्स घेतल्या होत्या. तरीही निवड न होण्यामागे केवळ त्याची कामगिरी किंवा गोलंदाजीच कारणीभूत नाही, तर टीम मॅनेजमेंटची धोरणं या निर्णयामागे असू शकतात. याशिवाय, शमीने काही दिवसांपूर्वी मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली होती, ज्याचा परिणाम त्याच्यावर झाला असल्याचं म्हटलं जातं.
अजित आगरकर अन् मोहम्मद शमीमध्ये वाद काय झाला?
अजित आगरकर आणि मोहम्मद शमी यांच्यातील मतभेदांचा मुद्दा ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या संघ निवडीनंतर समोर आला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी शमीला वगळण्यात आलं होतं. त्यामागचं कारण सांगितलं गेलं की, तो पूर्णपणे फिट नाही. या फिटनेसवरील वक्तव्यावर शमीने रणजी सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिलं होतं. शमी म्हणाला होता, “जर मी टेस्ट सामन्यात दिवसभर खेळू शकतो, गोलंदाजी करू शकतो, तर मग वनडेमध्ये का नाही? तुम्ही पाहताच आहात माझी फिटनेस कशी आहे.” त्याने अजित आगरकरने फोनवर संपर्क न साधल्याबाबतही नाराजी व्यक्त केली होती.
दोन वर्षांपासून कसोटीत नाही शमी (Has Mohammed Shami played his last Test match for India?)
मोहम्मद शमीला जवळपास दोन वर्षांपासून कसोटी संघात संधी मिळालेली नाही. शेवटचा वेळ तो जून 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याने वनडे आणि टी-20 मध्ये मात्र भाग घेतला. शमी यंदाच्या सुरुवातीला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत दिसला होता, तसेच इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतही खेळला होता. मात्र त्यानंतर त्याची पुन्हा टीम इंडियात पुनरागमन झालेली नाही.
हे ही वाचा -