Ranji Trophy News : सामना ड्रॉ, एक इनिंग झालीच नाही, तरीही रणजीच्या फायनलमध्ये जम्मू-काश्मीर विजयी; काय सांगतो BCCI चा नियम?
Jammu and Kashmir Ranji Trophy Champion : रणजी ट्रॉफी 2025-26 हंगामात इतिहास रचत जम्मू-काश्मीर संघाने पहिल्यांदाच विजेतेपदावर मोहोर उमटवली.

Jammu and Kashmir Ranji Trophy Champion : रणजी ट्रॉफी 2025-26 हंगामात इतिहास रचत जम्मू-काश्मीर संघाने पहिल्यांदाच विजेतेपदावर मोहोर उमटवली. अंतिम सामन्यात जम्मू-काश्मीरचा सामना कर्नाटक संघाशी झाला. या लढतीत जम्मू-काश्मीरने एकतर्फी वर्चस्व गाजवत ट्रॉफी आपल्या नावावर केली. पहिल्याच डावात 584 धावांचा डोंगर उभारत त्यांनी सामन्यावर पकड मजबूत केली आणि अखेर सामना अनिर्णित (Draw) राहूनही ते विजेते ठरले.
जम्मू-काश्मीरची दमदार फलंदाजी
कर्नाटकविरुद्धच्या अंतिम सामन्यात जम्मू-काश्मीरच्या फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना संघाने पहिल्याच डावात 584 धावा फलकावर लावल्या. या डावात शुभम पुंडिरने शानदार शतक झळकावले, तर पाच फलंदाजांनी अर्धशतके ठोकत भक्कम पाया रचला.
दुसऱ्या डावातही जम्मू-काश्मीरच्या फलंदाजांनी आपला दबदबा कायम ठेवला. सलामीवीर कामरान अकमलने नाबाद 160 धावांची खेळी केली, तर अष्टपैलू साहिल लोट्राने नाबाद 101 धावा करत शतक पूर्ण केले. परिणामी, दुसऱ्या डावात 4 गडी गमावून 342 धावा उभारण्यात संघाला यश आले.
A maiden First-Class century 💯
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 28, 2026
On the grandest stage of all 🏟️
A moment he will never forget ✨
Sahil Lotra puts up a performance that he will remember for a lifetime 🫡
Updates ▶️ https://t.co/G0ytZLEyNB#RanjiTrophy | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/YOl1SgTEmD
मयंक अग्रवाल एकटा नडला, पण....
जम्मू-काश्मीरने पहिल्या डावात 584 धावा केल्यानंतर कर्नाटक संघ पहिल्या डावात केवळ 293 धावांवर गारद झाला. कर्नाटककडून मयंक अग्रवालने 160 धावांची झुंजार खेळी केली, पण त्याला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. एकाही फलंदाजाला 40 धावांचा टप्पा पार करता आला नाही, त्यामुळे सामना हळूहळू कर्नाटकच्या हातातून निसटत गेला.
ड्रॉ असूनही जम्मू-काश्मीर विजेता का?
कसोटी क्रिकेटमध्ये 5 दिवस खेळूनही निकाल लागला नाही तर तो सामना ड्रॉ मानला जातो, पण फायनलमध्ये एकाला तरी विजेता घोषित करणं गरजेचं असतं. रणजी ट्रॉफीच्या नियमानुसार, जर 5 दिवसांचा खेळ संपल्यानंतरही सामन्याचा निकाल लागला नाही, तर ज्या संघाने पहिल्या डावात जास्त धावा केल्या असतात, त्या संघाला विजयी घोषित केले जाते. जम्मू-काश्मीरने पहिल्या डावात 584 धावा करत आघाडी घेतली होती. त्यामुळेच त्यांना 2025-26 हंगामाचे चॅम्पियन घोषित करण्यात आले. इतिहासात प्रथमच विजेतेपद पटकावत जम्मू-काश्मीरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली ताकद सिद्ध केली आहे.
हे ही वाचा -





















