Ind vs IRE- 2nd T20 : आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंग याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. यजमान आयर्लंडला हा सामना करो या मरो असा आहे. तीन सामन्याच्या मालिकेत भारतीय संघ 1-0 ने आघाडीवर आहे. दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरले, दुसरीकडे आयर्लंडचा संघ मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. 


पहिला सामना झाला तिथेच डबलिन येथे दुसरा टी 20 सामना होत आहे.  दुसऱ्या टी 20 सामन्यात यजमान आयर्लंडने नाणेफेक जिंकून पाहुण्या भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेय. या सामन्यासाठी बुमराहने भारतीय संघात कोणताही बदल केला नाही. पहिल्या सामन्यातील विजयी संघ कायम ठेवला आहे. त्याशिवाय आयर्लंडच्या संघातही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 


भारताची प्लेईंग 11 : 


ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयसवाल, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रिंकू सिंह, शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह (कर्णधार), रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा


आयर्लंडची प्लेईंग 11 :


पॉल स्टर्लिंग (कर्णधार), एंड्रयू बालबर्नी, लोर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅक्कार्थी, क्रेग यंग, ​​जोशुआ लिटिल आणि बेंजामिन व्हाइट. 






आज पावसाची काय स्थिती?


आयर्लंड येथे स्थानिक वेळेनुसार दुपारी तीन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. तर भारतीय वेळेनुसार सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होणार आहे. त्याआधी अर्धा तास नाणेफेक होईल. पावसामुळे पहिला टी 20 सामना पूर्ण होऊ शकला नव्हता. पण दुसऱ्या सामन्यात पावसाची शक्यता कमीच आहे. आज डबलिनमधील हवमान साफ असेल, असे स्थानिक हवामान विभागाने सांगितलेय. 


एक्यूवेदर वेबसाइटनुसार,  डबलिनमध्ये दुपारी तीन ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत हवामान साफ असेल, पावसाची शक्यता नाही. दरम्यान, पावसाची शक्यता नसल्यामुळे चाहत्यांना आजचा सामना पूर्ण पाहण्याची संधी मिळणार आहे. आजच्या सामन्याचा क्रीडाप्रेमी आनंद घेऊ शकतात.  


पहिल्या सामन्यात पावसाचा खोडा, भारताचा दोन धावांनी विजय 


18 ऑगस्ट रोजी डबलिन येथे पहिला टी 20 सामना झाला होता. या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. डकवर्थ लुईस नियमांनुसार, हा सामना भारताने दोन धावांनी जिंकला होता. आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 140 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्यु्त्तरदाखल भारातने 6.5 षटकात दोन विकेटच्या मोबदल्यात 47 धावा केल्या होत्या. त्यादरम्यान डबलिन येथे जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा सामना सुरु होऊ शकला नाही. सामना थांबला तेव्हा भारतीय संघ डकवर्थ लुईस नियमांनुसार दोन धावांनी पुढे होता. त्यामुळे भारतीय संघाला दोन धावांनी विजयी घोषीत करण्यात आले. आजच्या सामन्यात पावसाची शक्यता नाही. त्यामुळे सामना पूर्ण होईल, असा अंदाज आहे.