India Women vs Australia Women 1st T20I : हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत विजयी सुरुवात केली. रविवारी सिडनी क्रिकेट मैदान येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा डकवर्थ-लुईस (DLS) पद्धतीनुसार 21 धावांनी पराभव केला. पावसामुळे सामना प्रभावित झाला होता, ज्यामुळे नाणेफेक 15 मिनिटे उशिरा झाली.

Continues below advertisement

अरुंधती रेड्डीची घातक गोलंदाजी

अरुंधति रेड्डी हिने भेदक मारा करत चार षटकांत केवळ 22 धावा देत 4 बळी घेतले. तिच्या या कामगिरीबद्दल तिला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. रेणुका सिंग आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी दोन बळी घेत मोलाची साथ दिली.

Continues below advertisement

भारताला मिळाले 134 धावांचे लक्ष्य

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. ऑस्ट्रेलियाला 18 षटकांत 133 धावांवर रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. 134 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृति मानधना आणि शेफाली वर्मा यांनी 33 धावांची भागीदारी करत सावध सुरुवात केली. शेफालीने 11 चेंडूत 21 धावा (1 चौकार, 2 षटकार) केल्या. मात्र पाचव्या षटकानंतर पुन्हा पावसाने व्यत्यय आणला आणि सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही. 5.1 षटकांनंतर DLSनुसार भारताचा स्कोअर आवश्यक धावसंख्येपेक्षा पुढे असल्याने भारताला विजेता घोषित करण्यात आले. मानधनाने 17 चेंडूत नाबाद 16 धावा केल्या, तर जेमिमा रोड्रिग्सने 3 चेंडूत नाबाद 9 धावा जोडल्या.

ऑस्ट्रेलियाची तुफानी सुरुवात, पण... 

ऑस्ट्रेलियाने तुफानी सुरुवात केली होती. एलिस पेरी (20) आणि फोएबे लिचफील्ड (26) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी करत डाव सावरला. मात्र हरमनप्रीतने मागे धावत घेतलेला पेरीचा अप्रतिम झेल हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. यानंतर जॉर्जिया वेअरहॅम (30) आणि निकोला कॅरी (12) यांनी सहाव्या विकेटसाठी 41 धावा जोडत संघाला 100 धावांपार नेले. पण शेवटच्या टप्प्यात भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत ऑस्ट्रेलियाचे शेवटचे पाच बळी अवघ्या 12 धावांत घेतले.

नव्या युगाची सुरुवात

ऑस्ट्रेलियन संघ सध्या नव्या नेतृत्वाखाली खेळत आहे. जानेवारीत टी-20 संघाची कर्णधारपदाची सूत्रे सोफी मोलिन्यूक्सकडे सोपवण्यात आली असून तिच्या नेतृत्वाखाली संघ नव्या पर्वाची सुरुवात करत आहे. भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेत दमदार इशारा दिला आहे. पुढील सामन्यांतही अशीच कामगिरी कायम ठेवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.

हे ही वाचा -

KL Rahul Century News : जावयाने मैदान मारलं, अन् सासऱ्यांचे डोळे भरून आले! KL राहुलच्या शतकानंतर सुनील शेट्टींची रिॲक्शन व्हायरल, नेमकं काय घडलं?, VIDEO