IND vs WI T20 World Cup 2026 : कोलकाताच्या ईडनवर वेस्ट इंडिजसमोर भारताचा भूतकाळ काय सांगतो? हा एक ट्विस्ट ठरवणार अंतिम चारचं भविष्य
India vs West Indies Head to Head Stats : सुपर-8 फेरीत दक्षिण आफ्रिका कडून झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाने जबरदस्त पुनरागमन करत झिम्बाब्वेला हरवले आणि आशा जिवंत ठेवल्या.

India vs West Indies Super 8 ICC T20 World Cup 2026 : भारतीय संघ टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. सुपर-8 फेरीत दक्षिण आफ्रिका कडून झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाने जबरदस्त पुनरागमन करत झिम्बाब्वेला हरवले आणि आशा जिवंत ठेवल्या. ग्रुप-1 मधून दक्षिण आफ्रिकेने सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले आहे. आता उरलेल्या एका जागेसाठी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात थेट लढत होणार आहे. रविवारी कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर हा निर्णायक सामना रंगणार आहे. जो जिंकेल, तोच सेमीफायनलमध्ये जाईल.
धक्क्यानंतर सावरलेला भारत
ग्रुप टप्प्यात भारतीय संघ अपराजित राहिला. सर्व सामने जिंकत आत्मविश्वास उंचावला होता. मात्र सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 76 धावांनी भारताचा पराभव केला आणि स्पर्धेतील पहिला मोठा धक्का दिला. त्या पराभवामुळे पुढील वाटचाल कठीण झाली. सुदैवाने दक्षिण आफ्रिकेने पुढील सामन्यात वेस्ट इंडिजला हरवले आणि भारतासाठी समीकरणे खुली झाली. त्यानंतर भारताने झिम्बाब्वेविरुद्ध 72 धावांनी दमदार विजय मिळवत सेमीफायनलच्या आशा जिवंत ठेवल्या. आता एक मार्चला होणारा भारत-वेस्ट इंडिज सामना म्हणजे करो या मरोचीच लढत ठरणार आहे.
स्पर्धेतील भारताचा आतापर्यंतचा प्रवास
- पहिल्या सामन्यात अमेरिकेवर 29 धावांनी विजय
- दुसऱ्या सामन्यात नामिबियावर 93 धावांनी मात
- तिसऱ्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 61 धावांनी पराभूत करत सुपर-8 मध्ये प्रवेश
- शेवटच्या ग्रुप सामन्यात नेदरलँड्सवर 17 धावांनी विजय
- सुपर-8 मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाला
- झिम्बाब्वेविरुद्ध 72 धावांनी विजय
वेस्ट इंडिज संघाचा आतापर्यंतचा प्रवास
- स्कॉटलंडवर 35 धावांनी विजय
- इंग्लंडला 30 धावांनी पराभूत
- नेपाळला 9 गडी राखून हरवले
- इटलीवर 42 धावांनी विजय
- सुपर-8 मध्ये त्यांनी झिम्बाब्वेला 107 धावांनी हरवले.
- दक्षिण आफ्रिकेकडून 9 गडी राखून पराभव पत्करावा लागला.
ईडन गार्डन्सवरील इतिहास भारताच्या बाजूने
भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजचा विक्रम प्रभावी नाही. त्यांनी येथे एकूण सात टी-20 सामने खेळले असून तीन जिंकले आणि चार गमावले. विशेष म्हणजे, या मैदानावर भारताविरुद्ध खेळलेल्या सर्व टी-20 सामन्यांत वेस्ट इंडिजला पराभवच पत्करावा लागला आहे.
कोलकातातील भारत-वेस्ट इंडिज टी-20 निकाल
- 4 नोव्हेंबर 2018 – भारत 5 गडी राखून विजयी
- 16 फेब्रुवारी 2022 – भारत 6 गडी राखून विजयी
- 18 फेब्रुवारी 2022 – भारत 8 धावांनी विजयी
- 20 फेब्रुवारी 2022 – भारत 17 धावांनी विजयी
चार वर्षांनंतर पुन्हा एकदा या ऐतिहासिक मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. इतिहास भारताच्या बाजूने असला, तरी अंतिम निकाल मैदानावरच्या कामगिरीवरच ठरणार आहे.
हे ही वाचा -





















