भारताने नामिबियावर 93 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
गुरुवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या गट सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ईशान किशन आणि हार्दिक पांड्या यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकांत 9 बाद 209 धावांचा भक्कम डोंगर उभारला.
210 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नामिबियाची फलंदाजी भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकली नाही.
संपूर्ण संघ 18.2 षटकांत 116 धावांवर गारद झाला आणि भारताने 93 धावांनी विजय नोंदवला.
या स्पर्धेतील भारताचा हा सलग दुसरा विजय ठरला. यापूर्वी पहिल्याच सामन्यात अमेरिकेला पराभूत करत टीम इंडियाने आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली होती.
या विजयामुळे भारताने गट ‘अ’च्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले असून पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. आता सर्वांचे लक्ष रविवारी (15 फेब्रुवारी) होणाऱ्या भारत–पाकिस्तान सामन्याकडे लागले आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत दडपणाचा आणि प्रतिष्ठेचा ठरणार आहे.





















