दुबई: क्रिकेट विश्वातील प्रतिष्ठेच्या स्पर्धांपैकी एक असणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघ गुरुवारी पहिला सामना खेळणार आहे. या सलामीच्या सामन्यात भारताची गाठ बांगलादेशी संघाशी पडणार आहे. अलीकडच्या काळात बांगलादेशी संघ हा भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात काय घडणार, याची उत्सुकता भारतीय क्रिकेटप्रेमींना लागली आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल असल्या तारांकित खेळाडुंचा भरणा असलेली टीम इंडिया कागदावर बांगलादेशच्या संघापेक्षा सरस मानली जात आहे. मात्र, भारताचा प्रमुख गोलंदाज असलेला जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार नाही. ही भारतीय संघाची सर्वात मोठी उणीव मानली जात आहे. बांगलादेशचा संघ हा धक्कादायक निकालांची नोंद करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात बांगलादेशी संघ टीम इंडियाला धक्का देण्याचा शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही.
बांगलादेशने अलीकडच्या काळात 'आयसीसी'च्या स्पर्धांमध्ये अनेकदा भारतीय संघाला कडवी झुंज दिली आहे. आजच्या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नजमुल हसन शांतो आणि मेहिदी हसन मिराज हे दोन खेळाडू टीम इंडियासाठी धोकादायक ठरु शकतात. हे दोन खेळाडू कोणत्याही क्षणी सामन्याचा नूर पालटू शकतात. मेहिदी हसन मिराज अष्टपैलू खेळाडू असल्यामुळे त्याने गोलंदाजी आणि फलंदाजीत चमकदार कामगिरी केल्यास भारतीय संघाच्या अडचणी वाढू शकतात. याशिवाय, मुशफिकूर रहीम आणि महमुदुल्ला या अनुभवी खेळाडूंच्या जोरावर बांगलादेशचा संघ धक्कादायक निकालाची नोंद करु शकतो.
टीम इंडियाने यापूर्वी 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे शेवटचे जेतेदप जिंकले होते. तर 2017 मध्ये अंतिम सामन्यात पाकिस्तानी संघाने भारताला पराभूत केले होते. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा भारताचा प्रयत्न असेल. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची उणीव भारतीय संघाला निश्चितच भासेल. त्याच्या अनुपस्थितीत भारतीय गोलंदाज कशी कामगिरी करतात, हे बघावे लागेल.
अंतिम 11 खेळाडुंमध्ये कोणाकोणाला स्थान?
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या अंतिम 11 खेळाडुंच्या संघात कोणाकोणाला स्थान मिळणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. प्रशिक्षक गौतम गंभीरच्या लेफ्ट-राईट कॉम्बिशेनच्या आग्रहामुळे केएल राहुल कोणत्या क्रमांकावर खेळणार हे बघावे लागेल. तसेच मोहम्मद शामीसोबत अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांच्यापैकी कोणाला पसंती मिळणार, हे बघावा लागेल. याशिवाय, तिसरा स्पिनर म्हणून कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांच्यापैकी कोणाची संघात वर्णी लागणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा
