India's Women Win First Cricket World Cup Title : भारताने दक्षिण आफ्रिकेला अंतिम सामन्यात 52 धावांनी पराभूत करत महिला वनडे वर्ल्ड कपचं विजेतेपद (India Won Women's World Cup 2025) आपल्या नावावर केलं. हा फक्त एक विजय नव्हता तर हा होता एक इतिहास. कारण 25 वर्षांनंतर महिला क्रिकेटला नवा विश्वविजेता मिळाला. याआधी फक्त ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या नावावरच किताब जात होता. पण या वेळेस, भारतीय मुलींनी जगाला दाखवलं की मेहनत, जिद्द आणि स्वप्नांच्या जोरावर काहीही शक्य आहे. धारावीच्या गल्लीबोळांतून क्रिकेट स्वप्न पाहणारी राधा यादव असो या मोहालीतल्या मैदानावर स्वतःचं नाव कोरणारी अमनजोत कौर. ही भारतातील कानाकोपऱ्यातून टीम इंडियाला वर्ल्डकप जिंकणाऱ्या 11 वाघिणींची कहाणी आहे.

Continues below advertisement


स्मृती मानधाना (Smriti Mandhana)



महाराष्ट्रातील सांगलीची स्मृती मानधाना लहानपणापासून मुलांबरोबर क्रिकेट खेळत होती. वडील आणि भाऊ दोघेही क्लब क्रिकेटर असल्याने तिला खेळाची ओढ बालपणापासूनच होती. तिच्या अचूक टाइमिंग आणि शॉट सेलेक्शनमुळे ती भारतीय संघाची सर्वात विश्वासार्ह फलंदाज बनली. अनेक वेळा तिने संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले असून आज ती महिला क्रिकेटची जागतिक आयकॉन आहे.


शेफाली वर्मा (Shafali Verma)


हरियाणातील रोहतकमध्ये शेफाली वर्मा जेव्हा गल्ली क्रिकेट खेळू लागली, तेव्हा अनेकांनी तिला “मुलांचा खेळ” म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला. पण शेफाली थांबली नाही. केवळ 15 व्या वर्षी तिने भारताकडून पदार्पण केले आणि तिच्या आक्रमक फलंदाजीने जगातील प्रत्येक गोलंदाजांला धुतले.


जेमिमा रॉड्रिग्स (Jemimah Rodrigues)


मुंबईची जेमिमा रॉड्रिग्स एका संगीतप्रेमी कुटुंबातून आली आहे. तिचे वडील शाळेत क्रिकेट कोच आहेत. अभ्यास, संगीत आणि क्रिकेट. तिन्ही क्षेत्रांत ती तितकीच कुशल आहे. तिच्या हसऱ्या चेहऱ्याइतकीच तिची फलंदाजी मोहक आहे. उपांत्य सामन्यातील तिच्या शतकी खेळीमुळे भारताने ऐतिहासिक विजय मिळवला.


हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur)


पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील हरमनप्रीत कौर म्हणजे भारतीय महिला क्रिकेटचं हृदय आहे. 2017 च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिची 171* धावांची धडाकेबाज खेळी तिला ‘लेडी धोनी’ बनवते. तिच्या नेतृत्वाखाली भारताने आता विश्वविजेतेपद जिंकले आहे.


अमनजोत कौर (Amanjot Kaur)


मोहालीची अमनजोत कौर हिने पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातून क्रिकेटचा प्रवास सुरू केला. घरची आर्थिक परिस्थिती कठीण होती, पण वडिलांच्या प्रोत्साहनाने तिने हार मानली नाही. आज ती भारताच्या मधल्या फळीची मजबूत कडी आहे आणि तिच्या अचूक स्ट्रोक्सने सामना बदलण्याची क्षमता तिच्यात आहे.


दीप्ती शर्मा (Deepti Sharma)


उत्तर प्रदेशातील सहारनपूरची दीप्ती शर्मा संघातील सर्वात विश्वासार्ह ऑलराउंडर आहे. तिने आपल्या भावासोबत सराव करत क्रिकेट शिकलं. तिचं संयमित खेळणं आणि गोलंदाजीतील नियंत्रण हे भारताच्या विजयाचं प्रमुख शस्त्र आहे.


ऋचा घोष  (Richa Ghosh)


ऋचा घोष पश्चिम बंगालची आहे. तिचे वडील स्वतः क्रिकेट प्रशिक्षक आहेत. 16 व्या वर्षीच तिने भारतासाठी खेळायला सुरुवात केली. तिची आक्रमक फलंदाजी आणि विकेटमागील चपळता तिला संघाचा अविभाज्य भाग बनवते.


राधा यादव (Radha Yadav


मुंबईच्या धारावी झोपडपट्टीतून आलेली राधा यादव आज लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहे. डावखुरी फिरकी गोलंदाज असलेली राधाने दिग्गज फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडले आहे. दुध विकणाऱ्या कुटुंबातील ही मुलगी आज देशाची शान बनली आहे.


क्रांती गौड (Kranti Gaud)


मध्य प्रदेशातील क्रांती गौड एकेकाळी फक्त नेट बॉलर होती. वडिलांची नोकरी गेल्यानंतर घर चालवणं कठीण झालं, पण तिने हार मानली नाही. आज ती भारताच्या वेगवान गोलंदाजीची नवीन ओळख आहे आणि गरीब घरातील प्रत्येक मुलीची प्रेरणा ठरली आहे.


श्री चरणी (Shree Charani


आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातून आलेली श्री चरणी सुरुवातीला खो-खो आणि बॅडमिंटन खेळायची. नंतर तिने क्रिकेटला आपलं स्वप्न बनवलं. गावातील धुळीच्या पिचवरून जागतिक विश्वचषकाच्या मैदानापर्यंत तिचा प्रवास अविश्वसनीय आहे. WPL मधील तिच्या चमकदार कामगिरीने ती देशासाठी खेळण्याची संधी मिळवली.


रेणुका ठाकूर (Renuka Singh Thakur)


हिमाचल प्रदेशातील पार्सा गावातील रेणुका ठाकूर हिचा प्रवास संघर्षाने भरला होता. वडिलांच्या निधनानंतर आईने एकटीने तिला घडवलं. एचपीसीए अकादमीत प्रशिक्षण घेतल्यानंतर तिने जलदगती गोलंदाजीला आपलं हत्यार बनवलं आणि आज ती भारताच्या पेस आक्रमणाची कणा आहे.


हे ही वाचा -


VIDEO : पराभूत होताच दक्षिण अफ्रिकेचे खेळाडू ढसाढसा रडू लागले; टीम इंडियाचे खेळाडू धावले, वर्ल्डकपच नव्हे मनंही जिंकले