IND vs ZIM : टीम इंडियाने खातं उघडलं अन् गेम फिरवला! झिम्बाब्वे पराभूत, भारताला सेमीफायनलचं तिकीट मिळणार?, 1 मार्चला ठरणार
India beat Zimbabwe T20 World Cup 2026 : अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पत्कराव्या लागलेल्या पराभवानंतर टीम इंडियाने चेन्नईच्या चेपॉक मैदानावर झिम्बाब्वेचा धुव्वा उडवला.

IND beat ZIM T20 World Cup 2026 Points Table Group 1 : अहमदाबादमधील पराभवाचा धक्का पचवून टीम इंडियाने टी-20 विश्वचषक 2026 च्या सुपर-8 फेरीत शानदार पुनरागमन केले आहे. चेन्नईच्या ऐतिहासिक चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा पराभव करत स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले आहे. या विजयामुळे भारताने केवळ गुणतालिकेत आपलं खातं उघडलं नाही, तर सेमी-फायनलच्या शर्यतीत स्वतःला जिवंत ठेवले आहे. आता सर्व नजरा 1 मार्चला होणाऱ्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या महामुकाबल्यावर लागल्या आहेत.
अभिषेक शर्मा (55) आणि हार्दिक पांड्या (50*) यांच्या अर्धशतकी खेळीच्या मदतीने टीम इंडियाने 20 षटकांत चार गडी गमावून 256 धावा केल्या. प्रत्युत्तर, झिम्बाब्वेचा संघ निर्धारित षटकांत 6 गडी गमावून केवळ 184 धावाच करू शकला. त्यांच्याकडून ब्रायन बेनेटने 97 धावांची नाबाद खेळी केली. भारताने झिम्बाब्वेला 72 धावांनी हरवून उपांत्य फेरीच्या दिशेने एक मजबूत पाऊल टाकले आहे.
अभिषेक शर्माने टी-20 विश्वचषकात पहिल्यांदाच ठोकले अर्धशतक
संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनीही आक्रमक फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी रचली. मात्र, मोठी खेळी करण्याची संधी संजूला (15 चेंडूत 24 धावा) साधता आली नाही. यानंतर अभिषेक शर्माने आपली लय कायम ठेवत शानदार अर्धशतक झळकावले. त्याला ईशान किशनची चांगली साथ मिळाली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी करत धावगती वाढवली. ईशानने 24 चेंडूत 48 धावांची तुफानी खेळी केली, मात्र झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने त्याला बाद करत ही भागीदारी मोडली. अभिषेकने 30 चेंडूत 55 धावा केल्या.
हार्दिक पांड्या आणि तिलक वर्माचं वादळ
दरम्यान, कर्णधार सूर्यकुमार यादवनेही आक्रमक अंदाज कायम ठेवला. त्याने अवघ्या 13 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 33 धावांची झंझावाती खेळी केली. भारताने 172 धावांवर चौथी विकेट गमावली असली तरी त्यानंतर हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी धावांचा अक्षरशः पाऊस पाडला. हार्दिक पंड्याने 23 चेंडूत नाबाद 50 धावा करत अर्धशतक पूर्ण केले. तिलक वर्मानेही नाबाद 44 धावा ठोकल्या. या दोघांच्या तुफानी फटकेबाजीमुळे टीम इंडियाने 257 धावांचा डोंगर उभारला.
ब्रायन बेनेट एकटा नडला अन्....
धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरुवात चांगली झाली, मात्र ती अपेक्षेपेक्षा संथ गतीने झाली. ब्रायन बेनेट आणि तादिवानाशे मारुमनी यांनी पहिल्या विकेटसाठी 6.2 षटकांत 44 धावांची भागीदारी उभी केली. मात्र अक्षर पटेलने मारुमनीला 20 धावांवर बाद करत ही जोडी फोडली.
त्यानंतर वरुण चक्रवर्तीने डियोन मायर्सला अवघ्या 6 धावांवर माघारी धाडत झिम्बाब्वेला आणखी एक धक्का दिला. या दोन झटक्यांनंतर कर्णधार सिकंदर रझा आणि ब्रायन बेनेट यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 72 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. रझाने 2 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 21 चेंडूत 31 धावांचे योगदान दिले. ब्रायन बेनेट एकटा नडला, पण संघांचा पराभव वाचू शकला नाही. ब्रायन बेनेटने 97 धावा केल्या.
टीम इंडियाचं सेमीफायनलचे समीकरण काय?
झिम्बाब्वेवरील विजयामुळे टीम इंडियाच्या सेमीफायनलच्या आशा आता पल्लवीत झाल्या आहेत. गटातील समीकरणे आता अत्यंत चुरशीची झाली असून भारताचा पुढील प्रवास स्पष्ट झाला आहे. जर भारतीय संघाने 1 मार्च रोजी होणाऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला, तर टीम इंडिया कोणत्याही इतर समीकरणावर अवलंबून न राहता थेट सेमीफायनल (उपांत्य फेरी) गाठेल.
हे ही वाचा -





















