India vs Netherlands : विश्वचषकात टीम इंडियाचा विजयाचा 'चौकार'! लिंबू टिंबू नेदरलँडसनं झुंजवलं, शेवटच्या षटकात विजय; आता सुपर-8 मध्ये दक्षिण आफ्रिकेचे आव्हान
India beat Netherlands : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात भारताने नेदरलँड्सवर 17 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

India vs Netherlands T20 World Cup 2026 : सूर्यकुमार यादवच्या कल्पक नेतृत्वाखाली भारतीय संघाने आपला विजयी रथ कायम राखला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारताने नेदरलँड्सचा 17 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने साखळी फेरीत 4 पैकी 4 सामने जिंकून आपली अपराजित मोहीम दिमाखात सुरू ठेवली आहे.
India hold firm to extend their unbeaten run at the #T20WorldCup despite a strong Netherlands fight 👊
— ICC (@ICC) February 18, 2026
📝: https://t.co/tLZL1cWXwl pic.twitter.com/YOn1U5p7lI
अभिषेक शर्मा पुन्हा शून्यावर OUT
या सामन्यात भारतीय संघाकडून सलामीला अभिषेक शर्मा आणि ईशान किशन मैदानात उतरले. मात्र अभिषेक पुन्हा एकदा दुर्दैवी ठरला. सामन्याच्या पहिल्याच षटकात नेदरलँड्सच्या गोलंदाजाच्या चेंडूवर तो शून्यावर बाद झाला. त्याने अवघ्या 3 चेंडूचा सामना केला आणि या विश्वचषकात त्याची शून्यावर बाद होण्याची हॅट्ट्रिकच पूर्ण झाली. यानंतर ईशान किशनने आक्रमक सुरुवात करत 18 धावा झटपट केल्या, पण तोही जास्त वेळ टिकू शकला नाही. त्याच्या बाद झाल्यानंतर भारताची अवस्था 39/2 अशी झाली.
एका टप्प्यावर तिलक वर्मा (31) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी डाव सावरला. मात्र नेदरलँड्सच्या क्षेत्ररक्षकाने अप्रतिम कॅच घेत तिलकला माघारी धाडले. त्यानंतर सूर्यकुमारही 28 चेंडूत 34 धावा करून बाद झाला आणि भारताचा स्कोअर 110/4 असा झाला.
शिवम दुबे आणि हार्दिक पांड्याचा तांडव
शेवटच्या षटकांत शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या यांनी तुफानी फटकेबाजी करत संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेले. एका क्षणी भारत 200 धावांचा टप्पा सहज पार करेल असे वाटत होते. दुबेने 31 चेंडूत 4 चौकार आणि 6 षटकारांसह 66 धावांची झंझावाती खेळी केली, तर हार्दिकने 21 चेंडूत 30 धावा जोडल्या. मात्र अखेरच्या षटकात दोघेही बाद झाल्याने भारताला 200 धावांचा आकडा गाठता आला नाही. नेदरलँड्सकडून गोलंदाजाने 3 बळी घेत प्रभावी कामगिरी केली आणि भारतीय डावाला आळा घातला.
नेदरलँड्सचा लढा अपयशी
194 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लिंबू-टंबू समजल्या जाणाऱ्या नेदरलँड्सने सर्वांनाच चकित केले. सलामीपासूनच त्यांनी भारतीय गोलंदाजांचा धैर्याने सामना केला. नेदरलँड्सच्या फलंदाजांनी खेळाच्या प्रत्येक षटकात धावगती राखण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे सामना शेवटच्या षटकापर्यंत लांबला. नेदरलँड्सने 20 षटकांत 7 गडी गमावून 176 धावा केल्या. भारताकडून वरुण चक्रवर्तीने तीन, शिवम दुबेने दोन, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
आता सुपर-8 मध्ये दक्षिण आफ्रिकेचे आव्हान
साखळी फेरीत अपराजित राहिल्यानंतर आता भारतीय संघ सुपर-8 फेरीसाठी सज्ज झाला आहे. भारताचा पुढचा मोठा सामना 22 फेब्रुवारीला बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. विशेष म्हणजे हा हाय-व्होल्टेज सामना देखील अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच खेळवला जाणार असून, संपूर्ण देशाचे लक्ष आता या लढतीकडे लागले आहे.
हे ही वाचा -




















