कोलंबो : भारत आणि श्रीलंका (IND vs SL ) यांच्यातील पहिली वनडे टाय झाली आहे. पहिली मॅच ड्रॉ झाल्यानंतर भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुले यांनी संघाच्या आगामी वाटचालीबद्दल मोठे  संकेत दिले आहेत. साईराज बहुतुले (Sairaj Bahutule) म्हणाले की भारताचे टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना गोलंदाजी देणं सुरु ठेवलं जाणार आहे. यामुळं विरोधी संघाच्या फलंदाजांना आश्चर्याचा धक्का दिला जाईल, असं  साईराज बहुतुले म्हणाले. 



भारतानं पहिल्या वनडेमध्ये शुभमन गिल याला एक ओव्हर दिली होती. शुभमन गिलनं त्या ओव्हरमध्ये 14 धावा दिल्या होत्या. साईराज बहुतुले म्हणाले, आम्ही या दिशेनं पुढं जाणार आहोत. पहिली मॅच संपल्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना ते म्हणाले इमानदारीनं सांगतो आपले फलंदाज चांगले गोलंदाज देखील आहेत. ते चांगली फलंदाजी करत असल्यानं गोलंदाजीवर जादा लक्ष देत नाहीत. मात्र, त्यांच्याकडे गोलंदाजी करण्याचं कौशल्य आहे. 


साईराज बहुतुले यांनी श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या टी 20 मॅचमधील उदाहरण दिलं, ते म्हणाले तुम्ही पाहिलं असेल टी 20 मालिकेत रिंकू सिंग आणि सूर्यकुमार यादवनं गोलंदाजी केली होती.त्याप्रकारे शुभमन गिलला संघात स्थान देण्यात आलं, आगामी काळात या खेळात ऑलराऊंडरचं महत्त्व वाढणार असल्याचं देखील साईराज बहुतुले म्हणाले. 


टॉप ऑर्डरचे एक किंवा दोन फलंदाज गोलंदाजी करु शकल्यास त्याचा संघाला नक्कीच फायदा होईल. मात्र, खेळपट्टीची स्थिती आणि परिस्थितीवर अवलंबून असेल. याशिवाय एखादा फलंदाज गोलंदाजी करत असल्यास विरोधी संघाला आश्चर्यचकीत करता येऊ शकतं. त्यामुळं भविष्यात फलंदाजांना गोलंदाजी करण्यासाठी अधिक संधी दिली जाईल. 



पहिल्या मॅच संदर्भात बोलताना साईराज बहुतुले म्हणाले की एकदिवसीय सामन्यात मॅच टाय होणं रोमांचक असतं, आम्हाला एक रन घेऊन मॅच संपवायला हवी होती. आम्ही चांगली गोलंदाजी केली होती. फलंदाजी करताना आम्ही काही टप्प्यांमध्ये चांगली कामगिरी केली. मात्र, चांगल्या भागिदारी केल्या असत्या तर विजय मिळाला असता. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी त्यांच्या योजनेनुसार योग्य प्रकारे नियोजन करुन गोलंदाजी केली त्याचा त्यांना फायदा झाला, असं देखील बहुतुले म्हणाले. 


श्रीलंकेच्या फलंदाजांनी देखील गोलंदाजी केली आणि यश मिळवलं. दुनिथ वेल्लालगे आणि चारिथ असलंका यांनी गोलंदाजी करत भारताच्या पाच विकेट घेतल्या. भारताच्या प्रमुख फलंदाजांना त्यांनी बाद केलं. 


संबंधित बातम्या : 


रोहित शर्मा दुसऱ्या मॅचमध्ये विजयासाठी मोठं पाऊल उचलणार, रिषभ पंतला संघात स्थान? कुणाला बाहेरचा रस्ता दाखवणार

Team India : दुसऱ्या मॅचमध्ये विजयासाठी रोहित शर्मा डाव टाकणार, हुकमी एक्का मैदानात उतरवणार? श्रीलंकेची कोंडी करण्यासाठी विशेष प्लॅन