Ind vs SA 2nd Test: भारतविरुद्धच्या दोन सामन्यांची कसोटी मालिका (India vs South Africa) दक्षिण अफ्रिकेने 2-0 अशा फरकाने जिंकली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात (Ind vs SA 2nd Test) दक्षिण आफ्रिकेनं भारताला 408 धावांनी पराभूत केलं. 549 धावांचं आव्हान गाठताना भारत 140 धावांतच गारद झाला. दक्षिण आफ्रिकेनं तब्बल 25 वर्षांनंतर भारतात (Team India) कसोटी मालिका जिंकली. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांनी वादग्रस्त विधान केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. चौथ्या दिवसाच्या खेळ संपल्यानंतर शुक्री कॉनराड यांनी विधान केलं होतं.
शुक्री कॉनराड काय म्हणाले? (Shukari Conard On Team India)
शुक्री कॉनराड म्हणाले, भारताला शक्य तितका वेळ मैदानात क्षेत्ररक्षणासाठी उभं ठेवायचं, थकवायचं हेच आमचं लक्ष्य होतं. एक प्रसिद्ध वाक्य वापरायचं तर, भारतीय संघाने अक्षरशः आमच्यासमोर लोटांगण घालावं. आम्हाला त्यांना सामन्यात परतण्याची कोणतीच संधी द्यायची नव्हती आणि अखेरच्या दिवशी व चौथ्या दिवसाच्या अखेर फलंदाजी करण्याचं आव्हान द्यायचं होतं, असं विधान शुक्री कॉनराड यांनी केलं होतं.
द. अफ्रिकेचा माजी खेळाडू डेल स्टेन काय म्हणाला? (Dale Steyn on Shukari Conard)
दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. मी शुक्री कॉनराड यांनी केलेल्या विधानाचं समर्थन करत नाही. तुम्ही असे शब्द वापरू शकत नाही. कधीही घमंड करु नये, हे खूप निराशाजनक आहे, असं डेल स्टेन म्हणाला.
अनिल कुंबळेंनेही केली कॉनराडवर टीका- (south africa shukari conard)
पाचव्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी, भारताचे दिग्गज माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांनी दक्षिण आफ्रिकेच्या प्रशिक्षकांना अहंकार टाळण्याचा आणि नम्र राहण्याचा सल्ला दिला. स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात कुंबळे म्हणाले, दक्षिण आफ्रिकेने कदाचित ही मालिका जिंकली असेल, परंतु जेव्हा तुम्ही शीर्षस्थानी असता तेव्हा तुमची शब्दांची निवड महत्त्वाची असते. अशा काळात नम्रता अत्यंत महत्त्वाची असते, असं अनिल कुंबळे म्हणाले.
सामना कसा राहिला? (Ind vs SA 2nd Test)
पहिल्या डावात 288 धावांची दमदार आघाडी घेतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेनं दुसरा डाव 260/5 वर घोषित केला. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी 549 धावांचं लक्ष्य ठेवलं गेलं. दुसऱ्या डावात ट्रिस्टन स्टब्स 93 धावांनी शतकाच्या उंबरठ्यावर बाद झाला. त्याचा विकेट पडताच बावुमानं डाव घोषित केला. आणि दुसऱ्या डावात भारताला 140 धावांत गुंडाळले आणि 408 धावांनी विजय मिळवला. हा भारताचा कसोटीतील आणि घरच्या मैदानावर धावांच्या फरकाने सर्वात मोठा पराभव आहे. याआधी 2004 मध्ये नागपुरात टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने 342 धावांनी पराभव केला होता.