Ishan Kishan Ind vs Pak T20 World Cup 2026 : क्रिकेटच्या मैदानात जेव्हा ईशान किशन नावाचं वादळ घोंगावायला लागतं, तेव्हा समोरचा गोलंदाज कोण आहे यानं काहीच फरक पडत नाही. पाकिस्तान विरुद्ध आजच्या सामन्यातही हेच पाहायला मिळालं. पण, दुर्दैवानं हे वादळ जितक्या वेगाने आलं, तितक्याच अनपेक्षितपणे शांत झालं. शतकाच्या उंबरठ्यावर असताना ईशानने केलेली एक छोटीशी चूक त्याला आणि टीम इंडियाला भारी पडली आहे.
अभिषेक शर्मा फ्लॉप, पण ईशान किशनचा तांडव
कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषक 2026 चा महासंग्राम रंगात आला आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. भारताला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्ध आपले खातेही उघडू शकला नाही आणि शून्य धावांवर बाद झाला.
धावांचा पाऊस आणि चौफेर फटकेबाजी
सामन्याच्या सुरुवातीपासूनच ईशान किशन अत्यंत आक्रमक मूडमध्ये दिसत होता. त्याने मैदानाचा कोणताही कोपरा सोडला नाही. अवघ्या 40 चेंडूत 77 धावांची स्फोटक खेळी करत त्याने प्रतिस्पर्धी पाकिस्तानी संघाचे कंबरडे मोडले होते. या खेळीत त्याने 10 खणखणीत चौकार आणि 3 षटकार खेचत प्रेक्षकांचा पैसा वसूल केला.
सईम अयुबचा 'तो' चेंडू अन् घात झाला!
पहिला गडी लवकर बाद झाल्यानंतर ईशान आणि तिलक वर्मा यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. या दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 87 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. असं वाटत होतं की, ही जोडी आज भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत सहज घेऊन जाईल. पण डावाचं नववं षटक सुरू होतं. सईम अयुब गोलंदाजी करत होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात ईशानने थोडी घाई केली. तो चेंडू खेळण्यासाठी थोडा मागे सरकला, पण त्याचा हाच पवित्रा घातकी ठरला. सईमने त्याला जाळ्यात पकडलं आणि ईशान किशन बाद झाला.
हे ही वाचा -