आशिया चषक हा भारत-पाकिस्तान (Ind vs Pak) सामन्यामुळे पहिल्यापासूनच वादाचा ठरला असून मैदानावरील पाकिस्तानी खेळाडूंच्या कृत्याने भारतीय चाहते प्रंचंड संतापले आहेत. तर, भारतीय खेळाडूंनी आपल्या कृतीतून, सामना जिंकून पाकिस्तानला उत्तर दिलंय. मात्र, या घटनेची आयसीसीने दखल घेत हारिस रऊफवर सामन्याच्या मिळकतीमधील 30 टक्के रक्कम दंड करण्यात आली आहे. त्यामुळे, 21 सप्टेंबर रोजीच्या सामन्यातून त्याला मिळणाऱ्या मानधनातील 30 टक्के रक्कम कपात होणार आहे. मात्र, आता पीसीबी हारिस रऊफच्या पाठीशी उभी राहिल्याचं दिसून येत आहे. पीसीबीचे प्रमुख मोहसिन नक्वी यांनी हारिस रऊफवर लावण्यात आलेल्या दंडाची रक्कम स्वत: भरण्याचा निर्णय घेतला आहे, पाकिस्तानी (Pakistan) मीडियाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहान आणि हारिस रऊफच्या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्यातील कृतीने जगाचे लक्ष वेधले होते. या सामन्यानंतर दोन्ही खेळाडूंवर सोशल मीडियातून जोरदार टीका झाली. 21 सप्टेंबर रोजीच्या सामन्यात साहिबजादा फरहानने भारताविरुद्ध अर्धशतक पूर्ण केल्यावर 'गन सेलिब्रेशन' केले. तर हारिस रऊफने विमान पाडल्याचा इशारा केला होता. मैदानावर सीमारेषेजवळ भारतीय फॅन्स त्याला विराट कोहलीचे नाव घेत चिडवत होते, त्यावेळी त्याने हातवारे करून विमान पाडणे आणि ‘6-0’ असे इशारे केले. या दोन्ही खेळाडूंनी जाणीवपूर्वक भारतीय संघ आणि चाहत्यांना उचकवण्याचा प्रयत्न केल्याने आयसीसीने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, भारत आणि पाकस्तान यांच्यात आशिया चषकातील अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी रात्री 8.00 वाजता होणार आहे.
मोहसीन नक्वी दंडाची रक्कम भरणार
आयसीसीने हारिस रऊफला मिळणाऱ्या मानधनाच्या रकमेवर 30 टक्के दंड ठोठवला आहे, तर साहिबजादाला वॉर्निंग देऊ केली होती. आता, पीसीबीचे प्रमुख मोहसीन नक्वी हे हारिस रऊफची रक्कम स्वत: भरणार आहेत. समा टीव्हीच्या वृत्तानुसार, हारिस रऊफवर लादलेल्या दंडाची रक्कम स्वत: मोहसीन नक्वी भरणार आहेत, ते पीसीबीचे प्रमुख असून पाकिस्तान सरकारमध्ये मंत्री देखील आहेत.
सूर्यकुमार यादवलाही 30 टक्के रक्कमेचा दंड
दरम्यान, 14 सप्टेंबरला भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन न केल्याचा मुद्दा पाकिस्तानला इतका खटकला की त्यांनी थेट अंपायरकडे जाऊन मॅच रिफरीकडे तक्रार केली होती. त्यानंतर यूएईविरुद्धच्या सामन्यापूर्वीही त्यांनी रडगाणे गायले. मात्र, पाकिस्तानने सगळ्या मर्यादा 21 सप्टेंबरला ओलांडल्या. जेव्हा भारत-पाकिस्तानमध्ये सुपर-4चा सामना खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंनी उचकवणारे इशारे केले. पण भारतीय खेळाडूंनी आपला संयम गमावला नाही. मात्र, टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने 14 सप्टेंबरच्या सामन्यावेळी पहलगाम हल्ल्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. त्यामुळे, त्याच्यावरही आयसीसीने कारवाई केली आहे. सूर्यावर देखील सामन्यातील रकमेच्या 30 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.