Ind vs Pak Champions Trophy 2025: 'या' पाच गोष्टी ठरल्या टर्निंग पॉईंट, पाकिस्तानला आरामात हरवून भारत कसा जिंकला?
Champions Trophy 2025: टीम इंडियाने रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात पाकिस्तानी संघावर दिमाखदार विजय मिळवला. विराट कोहलीची शतकी खेळी या सामन्याचे वैशिष्ट्य ठरली.

दुबई: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रविवारी भारत आणि पाकिस्तानी या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांचा सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर सहा गडी राखून मात केली. पाकिस्तानी संघाने प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघासमोर 242 धावांचे लक्ष्य उभे केले होते. हे आव्हान भारतीय संघाने जवळपास 43 व्या षटकात पूर्ण केले. विराट कोहली (Virat Kohli) आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने सहजपणे पाकिस्तानचे आव्हान पेलले. भारताच्या या विजयासाठी आणि पाकिस्तानच्या पराभवासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी कारणीभूत ठरल्या.
1. किंग कोहली इज बॅक
या सामन्यात विराट कोहलीने नाबाद शतकी खेळी करुन भारतीय संघाला विजय मिळवून दिला. गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहलीचा हरवलेला फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय होता. त्यामुळे विराट कोहली भारतीय संघात असावा की नाही, इथपर्यंत चर्चा रंगली होती. मात्र, काल पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात विराट कोहलीने पुन्हा एकदा आपला दर्जा दाखवून दिला. विराट कोहलीने शेवटपर्यंत खेळपट्टीवर ठाण मांडत हा सामना भारताच्या हातून निसटणार नाही, याची काळजी घेतली. विराट कोहलीने संयमी खेळी केली. त्याच्या शतकी खेळीत 72 धावा या धावून काढल्या होत्या. विराट कोहलीने कालच्या सामन्यात कुठेही विनाकारण आक्रमकता दाखवली नाही. खेळपट्टीचा नूर आणि संघाची गरज ओळखून विराट कोहली थंड डोक्याने खेळला.
2. पाकिस्तानची गोलंदाजी फेल
पाकिस्तानी संघाची गोलंदाजी हे त्यांचे सर्वात मोठे बलस्थान मानले जाते. पाकिस्तानी संघ कायमच फलंदाजांपेक्षा त्यांच्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. पाकिस्तानकडे शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ, नसीम शहा आणि अबरार अहमद असे चांगल्या दर्जाचे बॉलिंग युनिट आहे. त्यामुळे कालच्या सामन्यात भारतीय फलंदाज विरुद्ध पाकिस्तानी गोलंदाजी असे युद्ध पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, कालच्या सामन्यात पाकिस्तानचा एकही वेगवान गोलंदाज प्रभावी ठरला नाही. ज्या शाहीन आफ्रिदीच्या नावाने अनेक फलंदाजांच्या मनात धडकी भरते तो भारतीय फलंदाजांसमोर निष्प्रभ ठरला. शाहीनच्या गोलंदाजीचे दडपण न घेता भारतीय फलंदाजांनी त्याने टाकलेले अनेक चेंडू सीमापार भिरकावून दिले.
3. भारतीय फलंदाजांची भागीदारी तोडण्यात पाकिस्तानला अपयश
पाकिस्तानी संघाने दिलेल्या 242 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरल्यानंतर रोहित शर्मा 20 धावा करुन माघारी परतला. मात्र, त्यानंतर शुभमन गिलने आक्रमक फलंदाजी करत भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली. अबरार अहमदच्या अप्रतिम चेंडूवर शुभमन गिल 46 धावांवर बोल्ड झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि विराट कोहली मैदानात होते. सुरुवातीला श्रेयस अय्यर खूपच धीम्या गतीने धावा काढत होता. यावेळी त्याच्यावर दडपण निर्माण करुन त्याला बाद करण्यात पाकिस्तानी संघाला अपयश आले. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी चांगली भागीदारी करत भारतीय संघाला विजयाच्या समीप नेऊन ठेवले.
श्रेयस अय्यरने सुरुवातीला खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी वेळ घेतला. मात्र, नंतर त्याने गिअर चेंज केला आणि तो पाकिस्तानी खेळाडुंवर तुटून पडला. त्यामुळे विराट कोहलीवरचे दडपण नाहीसे झाले. विराट आणि श्रेयस अय्यर खेळपट्टीवर ठाण मांडून राहिल्याने पाकिस्तानी संघाला या सामन्यात एकदाही वरचढ होण्याची संधी मिळाली नाही.
4. एकेरी-दुहेरी धावा रोखण्यात पाकिस्तानला अपयश
या सामन्यात विराट कोहलीने नाबाद 100 धावा केल्या. त्यापैकी 72 धावा विराटने धावून काढल्या. रोहित शर्मा आणि शुभमन गिल बाद झाल्यानंतर विराट आक्रमक खेळण्याचा प्रयत्न करेल आणि बाद होईल, असा पाकिस्तानी संघाचा अंदाज होता. मात्र, विराट कोहली याने डोक्यावर बर्फ ठेवून फलंदाजी केली. विराट कोहलीने एक-दोन धावा काढत भारतीय संघाचा धावफलक सतत हलता ठेवला. व्यवस्थित क्षेत्ररक्षण लावून पाकिस्ताने या धावांना वेसण घातली असती तर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरवर दडपण निर्माण झाले असते. परंतु, विराट कोहली हा त्याच्या फिटनेसच्या जोरावर सतत एक-दोन धावा काढत राहिला. संधी मिळेल तेव्हा मोठे फटके मारत राहिला. यामुळे संपूर्ण सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी विराट कोहली किंवा अन्य कोणत्याही भारतीय फलंदाजाल पेचात पकडले, असा एकही क्षण पाहायला मिळाला नाही.
5. माईंड गेममध्ये पुन्हा भारताची सरशी
पाकिस्तानी संघ मोठ्या लढतींमध्ये विशेषत: भारतीय संघाविरूद्धच्या सामन्यात मानसिक दडपणाखाली येतो, अशी कायम चर्चा असते. कालच्या सामन्यातही हीच गोष्ट दिसून आली. पाकिस्तानी खेळाडूंच्या देहबोलीत कुठेही हा सामना जिंकायचाच, आहे, अशी जिगर दिसून आली नाही. विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल, हार्दिक पांड्या अशा एकाहून एक सरस फलंदाजांचा भरणा असलेल्या भारतीय संघासमोर पाकिस्तानने नांगी टाकली होती. भारतीय संघ जसप्रीत बुमराहशिवाय या स्पर्धेत खेळत आहे. मात्र, तरीही पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यानंतर पाकिस्तानी गोलंदाजांनी विराट कोहलीच्या दबावापुढे एकदाही चांगला स्पेल किंवा षटक टाकले नाही. विराट कोहलीने खेळपट्टीचा नूर ओळखून मोठे फटके मारायचे टाळले. त्याचा भर एकेरी-दुहेरी धावांवर होता. परंतु, पाकिस्तानी गोलंदाज त्याला रोखू शकले नाहीत.
आणखी वाचा
भाईने बोला, मारने का तो मारने का! रोहितचे हातवारे अन् विराटचा निर्णय, नेमकं काय घडलं?, VIDEO




















