IND vs PAK Asia Cup Rising Stars: आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 च्या स्पर्धेत काल भारत आणि पाकिस्तान यांच्यात (Ind vs Pak) सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 8 विकेट्सने पराभव केला. पाकिस्तानी फलंदाज माज सदाकत याने एकहाती सामना फिरवला. सदाकत याने नाबाद 79 धावा ठोकत भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. मात्र भारत आणि पाकिस्तानच्या या सामन्यात माज सदाकतच्याय झेलमुळे मैदानात जोरदार राडा पाहायला मिळाला. भारतीय संघाचे (Team India) खेळाडू आणि कर्णधार जितेश शर्मा (Jitesh Sharma) पंचांच्या निर्णयावर इतके नाराज झाले की खेळ काही काळासाठी थांबवण्यात आला.

Continues below advertisement

नेमकं काय घडलं? (India vs Pakistan Catch Controversy)

भारतीय संघाचा फिरकीपटू सुयश शर्मा 10 व्या षटकात गोलंदाजी करत होता. यावेळी माज सदाकतने पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारला. सीमारेषेवर उभ्या असलेल्या नेहाल वधेराने हवेत चेंडू पकडण्याचा उत्तम प्रयत्न केला. तोल गमावून त्याने सीमारेषेच्या आत उभ्या असलेल्या नमन धीरकडे चेंडू फेकला आणि धीरने झेल पूर्ण केला. यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी सेलिब्रेशन सुरु केले. झेल पूर्णपणे पकडला आहे, असं व्हिडीओवरुन दिसून आले. मात्र झेल पुन्हा पाहिल्यानंतर तिसऱ्या पंचांनी माज सदाकतला नॉट-आउट दिले. पंचांच्या या निर्णयानंतर सर्व खेळाडू चक्रावले. कर्णधार जितेश शर्मासह सर्व खेळाडू पंचांच्या अंगावर धावत जात वाद घालू लागले. यादरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

जितेश शर्माचा पंचांशी वाद- (Jitesh Sharma India vs Pakistan)

निर्णयानंतर लगेचच, भारतीय कर्णधार जितेश शर्मा रागावून पंचांना सामोरे गेला. तो निर्णयावर जोरदार वाद घालताना दिसला. त्यांच्या जोरदार वादानंतरही, पंच नियमांनुसार आपला निर्णय बदलू शकले नाहीत.

Continues below advertisement

नवीन आयसीसी नियमामुळे वाद- (New ICC Rule)

ऑक्टोबर 2025 पासून लागू होणाऱ्या आयसीसीच्या नवीन क्षेत्ररक्षण नियमांनुसार:

1- क्षेत्ररक्षक सीमारेषेबाहेर हवेत असताना चेंडूला एकदा स्पर्श करू शकतो.

2- क्षेत्ररक्षकाने चेंडूला स्पर्श करण्यापूर्वी किंवा सोडण्यापूर्वी मैदानात नियंत्रण मिळवले तरच झेल वैध मानला जातो.

या संपूर्ण प्रकरणात, असे मानले गेले की नेहाल वधेरा चेंडू आत टाकल्यानंतर मैदानात परतला नाही आणि तो स्वतः सीमारेषेबाहेर गेला होता. त्यामुळे, झेल "निष्पक्ष झेल" म्हणून पात्र ठरला नाही आणि सदाकतला नॉट आउट घोषित करण्यात आले.

सामना कसा राहिला? (IND vs PAK Asia Cup Rising Stars)

पाकिस्तानकडून माज सदाकतने उत्कृष्ट खेळ केला. त्याने 47 चेंडूत नाबाद 79 धावा करत पाकिस्तानला केवळ 13.2 षटकांत विजय मिळवून दिला. सदाकतने 7 चौकार आणि 4 षटकार मारले आणि दोन विकेट्सही पटकावल्या. तर भारताकडून वैभव सूर्यवंशीने 45 धावांची शानदार खेळी केली, तर नमन धीरने 35 धावांचे योगदान दिले. वैभव बाद झाल्यानंतर भारताचा डाव गडगडला आणि संपूर्ण संघ 136 धावांवर ऑलआउट झाला.

संबंधित बातमी:

Ind vs Pak : पाकिस्तानने धू धू धुतलं, टीम इंडियाचा दारुन पराभव; सेमीफायनलचं सगळं गणित बिघडलं, पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ