Priyanka Chaturvedi on IND vs PAK Asia Cup 2025 Schedule : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर आशिया कप क्रिकेट स्पर्धा रद्द होणार अशी शक्यता होती. पण आता आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी स्पर्धेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. ही स्पर्धा 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान युएईत (UAE) होणार आहे. या दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात बहुप्रतीक्षित सामना 14 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे.
या घोषणेनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सरकार आणि BCCIवर निशाणा साधताना म्हटले, "आतंकी अजूनही फरार आहेत, मग पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना कसा?"
प्रियंका चतुर्वेदी यांनी सांगितले की, "एकीकडे आज कारगिल विजय दिवस आहे, जो आपण आपल्या शूर जवानांना श्रद्धांजली अर्पण करतो, आणि त्याच दिवशी पाकिस्तानचे गृह मंत्री जे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) अध्यक्षही आहेत, ते आज आशिया कपच्या आयोजनाची घोषणा करतात. मी 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत संसदीय प्रतिनिधीमंडळाचा भाग होते, आणि आम्ही तिथे एकच गोष्ट ठामपणे मांडली होती, की आतंकवाद्यांसोबत कोणतेही संबंध नकोत. आजही पहलगाममधील दहशतवादी फरार आहेत. त्यांना शोधणे हीच आपली प्राथमिकता असली पाहिजे, हे आपण विसरू नये."
त्या पुढे म्हणाल्या की, "जेव्हा आपण पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडले आहेत, त्यांच्या यूट्यूब चॅनल्स आणि ट्विटर अकाउंट्स ब्लॉक केले आहेत, तेव्हा बीसीसीआयला भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना आयोजित करण्याची परवानगी कशी दिली जाते? हे केवळ माझं मत नाही, तर देशातील प्रत्येक नागरिक याचा निषेध करेल."
आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी शनिवारी घोषणा केली की, पुरुषांचा एशिया कप 9 ते 28 सप्टेंबरदरम्यान संयुक्त अरब अमीरातमध्ये (UAE) आयोजित केला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतीक्षित गटसाखळीतील सामना 14 सप्टेंबर रोजी (रविवार) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघ एकाच गटात आहेत, त्यामुळे 21 सप्टेंबर रोजी (पुन्हा रविवार) सुपर फोर फेरीत हे दोन संघ एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा -
