Ind vs Nz Final T20 World Cup 2026 : टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताने धडाकेबाज सुरुवात करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांना धू धू धुतले. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या जोडीने पॉवरप्लेमध्येच सामना एकतर्फी करण्याची झलक दाखवली. डावाच्या सुरुवातीला भारताने सावध सुरुवात करत दोन षटकांत बिनबाद 12 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर भारतीय फलंदाजांनी गियर बदलला आणि न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला.
पुढील चार षटकात ठोकल्या 80 धावा...
तिसऱ्या षटकात 15 धावा काढत भारताने आक्रमणाची सुरुवात केली. चौथ्या षटकात लॉकी फर्ग्युसनवर अभिषेक आणि संजूने तुफान हल्ला चढवत तब्बल 24 धावा काढल्या. त्यानंतर मॅट हेन्रीच्या पाचव्या षटकातही भारतीय फलंदाज थांबले नाहीत आणि या षटकात 21 धावा ठोकल्या. या धडाकेबाज फलंदाजीमुळे भारताने पाच षटकांनंतर बिनबाद 72 धावा केल्या. तर पॉवरप्ले संपेपर्यंत म्हणजे सहा षटकांत भारताचा स्कोर एकही विकेट न गमावता 92 धावांवर पोहोचला.
काय लोड नाही...; संजूचा विश्वास, अभिषेकची तुफानी फटकेबाजी
या आक्रमक खेळामागे संजू सॅमसनचा आत्मविश्वास महत्त्वाचा ठरला. पॉवरप्लेतील शेवटच्या षटकापूर्वी संजूने अभिषेकला म्हणत धीर दिला, “काय लोड नाही… अजून एक ओव्हर आहे पॉवरप्लेची.” आणि त्यानंतर अभिषेक शर्माने फक्त 18 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. फायनलमध्ये तो 21 चेंडूत 52 धावा करत आऊट झाला, त्याने 6 चौकार आणि 3 षटकार लगावले.
दुसऱ्या टोकाला संजू सॅमसनही जबरदस्त साथ देत आहे. तो 17 चेंडूत 33 धावांवर खेळत असून त्याने 2 चौकार आणि 3 षटकार मारले आहेत. फायनलसारख्या मोठ्या सामन्यात भारताची ही वादळी सुरुवात पाहून स्टेडियममधील चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. भारतीय संघाने पॉवरप्लेमध्येच न्यूझीलंडवर दबाव निर्माण करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला आहे.
सॅमसन आणि अभिषेक शर्माने इतिहास रचला
भारताचे सलामीवीर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा अंतिम सामन्यात इतिहास रचला. दोघांनी मिळून टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये पहिल्यांदाच 50 धावांची सलामी भागीदारी करत नवा विक्रम आपल्या नावावर केला. सॅमसन आणि अभिषेक यांनी किवी संघाच्या नव्या चेंडूच्या गोलंदाजांवर आक्रमण चढवत फक्त चार षटकांत 50 धावांची भागीदारी पूर्ण केली. याआधी टी-20 वर्ल्ड कप फायनलमधील सर्वात मोठी सलामी भागीदारी 48 धावा होती. हा विक्रम 2009 मध्ये पाकिस्तानच्या कामरान अकमल आणि शहजैब हसन यांनी श्रीलंकेविरुद्ध केला होता. तर भारतीय जोडीचा यापूर्वीचा सर्वोत्तम विक्रम 25 धावांचा होता. 2007 च्या फायनलमध्ये गौतम गंभीर आणि युसुफ पठाण यांनी पाकिस्तानविरुद्ध ही भागीदारी केली होती.
टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पॉवरप्लेमधील सर्वाधिक धावसंख्या
- 92/0 – भारत vs न्यूझीलंड, अहमदाबाद, 2026 फायनल
- 92/1 – वेस्ट इंडिज vs अफगाणिस्तान, ब्रिजटाउन, 2024
- 91/1 – नेदरलँड्स vs आयर्लंड, सिल्हेट, 2014
- 89/3 – इंग्लंड vs दक्षिण आफ्रिका, मुंबई, 2016
- 86/1 – भारत vs नामिबिया, दिल्ली, 2026
अहमदाबादमध्ये झालेल्या 2026 च्या अंतिम सामन्यात भारताने 6 षटकांच्या पॉवरप्लेमध्ये 92 धावा करत इतिहास रचला, जो टी-20 वर्ल्ड कपमधील सर्वाधिक पॉवरप्ले स्कोर ठरला.
हे ही वाचा -
