IND vs ENG Semi Final Turning Point : टीम इंडियानं इंग्लंडचा पराभव करून यंदाच्या आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या चुरशीच्या सामन्यात भारतानं इंग्लंडवर 7 धावांनी मात केली. भारतानं दिलेल्या 254 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी कडवी झुंज दिली. खासकरून मधल्या फळीतील जेकब बेथेलनं शतक झळकावलं. मात्र तरीही इंग्लंडचे प्रयत्न सात धावांनी अपुरे पडले. भारताकडून जसप्रीत बुमरानं प्रभावी मारा करताना 4 षटकात 33 धावा देत एक विकेट घेतली. तर हार्दिक पंड्यानंही 38 धावात दोन विकेट्स घेत भारताच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. या विजयासह भारतानं चौथ्यांदा स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. 

Continues below advertisement

Continues below advertisement

अक्षर पटेलचा झेल ठरला निर्णायक 

सामना इंग्लंडच्या बाजूने झुकल्यासारखा वाटत असतानाच 14 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नाट्यमय प्रसंग घडला. अर्शदीप सिंगच्या चेंडूवर विल जॅक्सने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू सीमारेषेबाहेर जाणार असे वाटत असतानाच अक्षर पटेलने हवेत झेप घेतली. तोल जात असल्याचे लक्षात येताच त्याने चेंडू हवेत फेकला. तिथे उभ्या असलेल्या शिवम दुबेने तो कॅच पूर्ण केला. हा झेल सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. जर तो षटकार गेला असता, तर सामन्याचा निकाल काही वेगळाच लागला असता.

इंग्लंडची जोरदार झुंज

इंग्लंडकडून जेकब बेथेलने धडाकेबाज खेळी करत भारताच्या गोलंदाजांना चांगलेच त्रास दिला. त्याने 48 चेंडूत 105 धावांची तुफानी खेळी करत सामना रंगतदार बनवला. 15 षटकांनंतर इंग्लंडचा स्कोअर 5 बाद 185 असा होता. विजयासाठी त्यांना शेवटच्या 30 चेंडूत 69 धावांची गरज होती आणि सामना अजूनही खुला होता.

बुमराहचे दोन षटके आणि खेळ संपला 

अशा मोठ्या सामन्यात जसप्रीत बुमराहने आपल्या अनुभवाची झलक दाखवली. 16 व्या षटकात त्याने केवळ 8 धावा दिल्या, तर 18 व्या षटकात फक्त 6 धावा दिल्या. शेवटच्या टप्प्यातील ही अचूक गोलंदाजी इंग्लंडसाठी घातक ठरली. या दोन षटकांत बुमराहने फक्त 14 धावा दिल्याने इंग्लंडवर दबाव प्रचंड वाढला आणि भारताचा विजय जवळपास निश्चित झाला. इंग्लंडने शेवटपर्यंत झुंज दिली, पण भारतीय गोलंदाजांनी संयम राखत सामना आपल्या बाजूने वळवला. अखेर भारताने हा थरारक सामना 7 धावांनी जिंकत टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

हे ही वाचा -

भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...