England vs India 5th Test Day-2 stumps Update : ओव्हल कसोटीत दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने दुसऱ्या डावात 2 गड्यांच्या मोबदल्यात 75 धावा केल्या आहेत. पहिल्या डावात इंग्लंडने 23 धावांची आघाडी घेतली होती, त्यामुळे आता स्टंप्सपर्यंत भारत 52 धावांनी आघाडीवर आहे. मात्र, के. एल. राहुल पुन्हा अपयशी ठरला आणि केवळ 7 धावांवर माघारी परतला. दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने शानदार अर्धशतक ठोकलं असून तो 51 धावांवर नाबाद आहे. त्याच्यासोबत आकाश दीप 4 धावांवर खेळत आहे.
एका दिवसांत 16 विकेट्स...
दुसऱ्या दिवशी भारताने 204/6 या स्थितीतून आपला डाव पुढे सुरू केला. करुण नायरने आधीच्या दिवशीच अर्धशतक झळकावले होते. मात्र दुसऱ्या दिवशी भारत अवघ्या 34 चेंडूंचाच खेळ करू शकला आणि या वेळेत उरलेली चारही विकेट्स गमावून बसला. केवळ 20 धावांची भर टाकत भारताचा डाव 224 धावांवर आटोपला. करुण नायरने 57 धावांची खेळी केली.
इंग्लंडची जोरदार सुरुवात पण...
इंग्लंडसाठी बेन डकेट आणि झॅक क्रॉली यांनी झंझावाती सुरुवात करून दिली. अवघ्या 13व्या षटकात इंग्लंडने 92 धावा करताना एकही विकेट गमावली नव्हती. डकेटने 43 आणि क्रॉलीने 64 धावा केल्या. मात्र क्रॉली बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांची पडझड सुरू झाली.
जो रूटने 29 धावा केल्या, तर हॅरी ब्रूक शेवटपर्यंत टिकून 53 धावा करून बाद झाला. विशेष म्हणजे इंग्लंडने पहिल्या 92 धावांत एकही विकेट गमावली नाही, पण त्यानंतर पुढच्या 155 धावांत संपूर्ण संघ कोसळला. 9 गडी बाद झाल्यानंतर इंग्लंडने डाव संपवला, कारण क्रिस वोक्स दुखापतीमुळे या सामन्याबाहेर गेला होता.
जैस्वालने ठोकले तुफानी अर्धशतक! भारत आघाडीवर
दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने आक्रमक सुरुवात करत फक्त 44 चेंडूत अर्धशतक ठोकले. विशेष म्हणजे त्याने सिक्स मारतच अर्धशतक पूर्ण केलं. राहुल फक्त 7 धावांवर बाद झाला आणि साई सुदर्शन अडचणीच्या खेळपट्टीवर 11 धावांवर तंबूत परतला. मात्र यशस्वीने आपल्या शैलीत इंग्लंडच्या गोलंदाजांना सडेतोड उत्तर दिलं. भारताकडे ५२ धावांची आघाडी आहे, आणि त्याच्याकडे अजून 8 विकेट्स शिल्लक आहेत. तिसऱ्या दिवशी सामन्याचा पूर्ण रंग उधळणार, हे निश्चित.
हे ही वाचा -
