India beat Pakistan T20 World Cup 2026 : सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियानं टी-20 विश्वचषकातल्या साखळी सामन्यात पाकिस्तानचा धावांनी धुव्वा उडवला. भारताचा गटनिहाय साखळीत सलग तिसरा विजय ठरला. या विजयासह भारतानं टी-20 विश्वचषकाच्या सुपर साखळीत धडक मारली. या सामन्यात भारतानं पाकिस्तानला विजयासाठी 176 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा अख्खा 114 डाव धावांत गडगडला. भारताच्या मोठ्या विजयाचे पाच हिरो कोण होते ते जाणून घेऊया....
ईशान किशनचे वादळ
सलामीच्या ईशान किशनची खेळी भारताच्या या विजयात निर्णायक ठरली. त्यानं 40 चेंडूत 10 चौकार आणि तीन षटकारांसह 77 धावांची खेळी करून भारताच्या डावाचा पाय रचला.
सूर्यकुमार यादवची संयमी पण मोलाची खेळी
कर्णधार सूर्यकुमार यादव या सामन्यात भारताकडून दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. ईशान बाद झाल्यानंतर मधल्या षटकांत त्याने शांत, संयमी आणि शहाणपणाची फलंदाजी करत संघाला 170 धावांच्या पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सूर्यकुमारने 29 चेंडूत 32 धावा केल्या, ज्यात तीन चौकारांचा समावेश होता.
हार्दिक पांड्याची दमदार सुरुवात
फलंदाजीत फारशी चमक दाखवता आली नसली तरी गोलंदाजीत हार्दिक पांड्या चमकला. दुसऱ्या डावात पहिल्याच षटकात त्याने पाकिस्तानला मोठा धक्का दिला. चौथ्या चेंडूवर त्याने सलामीवीर साहिबजादा फरहानला शून्यावर बाद केले.
बुमराहचा कहर
जागतिक दर्जाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुसरे षटक टाकायला आला आणि पाकिस्तानवर अक्षरशः कहर बनून कोसळला. पहिल्या चेंडूवर षटकार गेला तरी पुढच्याच चेंडूवर त्याने सॅम अयूबला एलबीडब्ल्यू करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. षटकाच्या अखेरीस त्याने पाकिस्तानी कर्णधार सलमान आघालाही बाद केले.
अक्षर पटेलची फिरकी
हार्दिक आणि बुमराहनंतर अक्षर पटेल याची फिरकी पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरली. त्याने आधी बाबर आझमला बोल्ड करत मोठा धक्का दिला. त्यानंतर 44 धावांवर उस्मान खानला बाद करत पाकिस्तानची शेवटची आशा संपवली. त्याच्यासोबत वरुण चक्रवर्तीने एका षटकात दोन विकेट घेत भारताचा विजय पक्का केला, तर कुलदीप यादव आणि तिलक वर्मानेही प्रत्येकी एक बळी घेतला.
हे ही वाचा -
