मुंबई : इंग्लंडमधल्या क्रिकेट विश्वचषकात वादग्रस्त ठरलेल्या चिपको एलईडी बेल्स बदलण्यास आयसीसीने नकार दिला आहे. विश्वचषकात वापरण्यात येत असलेली कोणतीही गोष्ट मध्येच बदलता येणार नाही. तसं झाल्यास विश्वचषकाच्या विश्वासार्हतेशी तडजोड केल्यासारखं होईल. सर्व दहा संघांसाठी सगळ्या सामन्यात एकसारख्याच गोष्टी असतील, असं आयसीसीने स्पष्ट केलं आहे.


या विश्वचषकात चेंडू यष्ट्यांवर आदळूनही एलईडी बेल्स पडत नसल्याचं जवळपास पाचवेळा आढळून आलं आहे. बेल्स वजनदार असल्याने हा प्रकार होत असल्याचं म्हटलं जात आहे.

रविवारी (9 जून) झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात जसप्रीत बुमराच्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नर बालंबाल बचावला होता. जसप्रीत बुमराने टाकलेला चेंडू स्टम्पवर आदळूनही तो बाद झाला नाही, कारण बेल्स पडल्या नाहीत. त्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिन्च या दोघांनीही त्याविषयी नाराजी व्यक्त केली होती.

आयसीसीचं म्हणणं आहे की, मागील चार वर्षात यष्ट्या बदललेल्या नाहीत. विश्वचषक 2015 पासून सर्व आयसीसी स्पर्धांमध्ये तसंच प्राथमिक क्रिकेट स्पर्धांमध्ये या यष्ट्यांचा वापर होत आहे. याचा अर्थ असा की, या यष्ट्यांचा वापर एक हजारांहून अधिक सामन्यांमध्ये झाला आहे.