IND vs ENG T20 World Cup Semi Final : वानखेडेची खेळपट्टी पाहताच गौतम गंभीर संतापला; पिच क्यूरेटरसोबत वाद?, इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलआधी काय घडलं?
IND vs ENG T20 World Cup Semi Final : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा सेमीफायनल सामना 5 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे रंगणार आहे.

Wankhede Pitch IND vs ENG T20 World Cup Semi Final : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा सेमीफायनल सामना 5 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे रंगणार आहे. दोन्ही संघांनी या टी-20 विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली असून आता अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी दोघेही पूर्ण ताकदीने उतरतील. टीम इंडियाने मुंबईत जोरदार सराव केला. याच सरावादरम्यान भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पिच क्युरेटरशी गंभीर चर्चेत गुंतलेले दिसले. त्या चर्चेतील त्यांचे हावभाव पाहून ते थोडे नाराज किंवा चिंताग्रस्त असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. संबंधित फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.
जुनीच खेळपट्टी...
रिपोर्टनुसार, भारत विरुद्ध यूएसए सामन्यात वापरण्यात आलेलीच पिच या सेमीफायनलसाठी वापरली जाणार आहे. त्या सामन्यात धावा काढताना भारतीय फलंदाजांना मोठी कसरत करावी लागली होती आणि सामना कमी धावसंख्येचा ठरला होता. त्यामुळे या वेळी पिचचा स्वभाव कसा असेल, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पाहता पिच कडक आणि उसळी देणारी वाटत असली तरी गंभीर यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती.
मात्र, येथे एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यावी लागेल आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पिचची जबाबदारी स्थानिक क्युरेटरकडे नसून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) कडे असते. त्यामुळे जर गंभीर काही मुद्द्यावर नाराजी व्यक्त करत असतील, तर त्यात वानखेड़ेच्या स्थानिक क्युरेटरची थेट भूमिका नसण्याची शक्यता अधिक आहे.
दरम्यान, रात्रीच्या सरावावेळी भारतीय खेळाडू लाईट्सखाली फिल्डिंग ड्रिल करत असताना क्युरेटर शांतपणे 22 यार्डांची पिच कव्हर करताना दिसले. या सगळ्या घडामोडींमुळे सामन्यापूर्वीच वातावरण तापले आहे.
टी-20 विश्वचषकातील टीम इंडियाची कामगिरी
टी-20 विश्वचषकात भारताचा प्रवास दमदार राहिला आहे. गट टप्प्यात भारत अपराजित राहिला. प्रथम यूएसएवर विजय, त्यानंतर नामिबियावर मात, आणि शेवटच्या दोन लीग सामन्यांत पाकिस्तान व नेदरलँड्सचा पराभव करत भारताने सुपर-8 मध्ये प्रवेश केला. सुपर-8च्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून 76 धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला, पण त्यानंतर झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवत भारताने सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले. आता सगळ्यांचे लक्ष 5 मार्चकडे लागले आहे, वानखेडेवर कोणता संघ दबदबा निर्माण करणार? पिचचा स्वभाव काय रंग दाखवणार? आणि गंभीर यांच्या चर्चेचा नेमका अर्थ काय होता? या सर्व प्रश्नांची उत्तरे मैदानावरच मिळणार आहेत.
हे ही वाचा -





















