Gautam Gambhir Ind vs NZ Final T20 World Cup 2026: 2 भारतीय दिग्गजांना मी हा विश्वचषक समर्पित करतो...; गौतम गंभीरचा मास्टरस्ट्रोक, नेमकं काय म्हणाला?
Gautam Gambhir T20 World Cup 2026: विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी एकत्रित माध्यमांशी संवाद साधला.

Gautam Gambhir T20 World Cup 2026: सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्त्वाखाली टीम इंडियानं आयसीसी टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2026) नवा इतिहास घडवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा 96 धावांनी (Ind vs NZ Final) धुव्वा उडवला. भारताने सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. आयसीसी टी-20 विश्वचषक लागोपाठ दुसऱ्यांदा आणि आजवर तिसऱ्यांदा जिंकणारा टीम इंडिया हा पहिला संघ ठरला.
विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी एकत्रित माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मी हा टी-20 विश्वचषक राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना समर्पित करू इच्छितो, असं गौतम गंभीर म्हणाला. राहुल द्रविड यांनी संघाला या टप्प्यावर आणले. यामध्ये व्हीव्हीएस लक्ष्मणचाही समावेश आहे, ज्यांनी एनसीएमध्ये खेळाडूंची एक मजबूत पिढी तयार केली, असं गौतम गंभीरने सांगितले.
Gautam Gambhir said, " I want to dedicate this T20 World Cup to Rahul Dravid and VVS Laxman. What Rahul Bhai has done for Indian cricket. VVS for how he has been leading the CoE". pic.twitter.com/O8e0w4GRts
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 8, 2026
सूर्यकुमार यादव काय म्हणाला? (Suryakumar Yadav T20 World Cup 2026)
आज जे घडलंय ते पूर्णपणे समजून घ्यायला थोडा वेळ लागेल, पण आजच्या यशामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. हा खूप मोठा आणि लांब प्रवास होता, असं सूर्यकुमार यादवने सांगितले. 2024 च्या विश्वचषकानंतर हा प्रवास सुरू झाला. त्या वेळी जय शाह सर तेव्हा बीसीसीआयचे सचिव, तसेच रोहित शर्मा आणि इतर सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि या कमाल संघाचं नेतृत्व करण्याची संधी दिली. त्यानंतरचा हा दीर्घ प्रवास करत नरेंद्र मोदी स्टेडियम येथे येऊन विश्वविजेते होणं ही खूप खास भावना आहे, असं सूर्यकुमार यादवने सांगितले.
न्यूझीलंडचा डाव कसा राहिला? (Ind vs NZ Final T20 World Cup 2026)
256 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांवर सुरुवातीपासूनच दबाव दिसून आला. टिम सीफर्ट आणि फिन अॅलन यांनी पहिल्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी केली, पण त्यानंतर कीवी संघाची घसरण सुरू झाली. न्यूझीलंडकडून टिम सीफर्टने सर्वाधिक 52 धावा केल्या. त्याने 26 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकार मारले. मात्र संघातील सात फलंदाज एक अंकी धावसंख्येत बाद झाले. केवळ 72 धावांवर न्यूझीलंडचे पाच फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. डॅरिल मिचेलने 11 चेंडूत 17 धावा केल्या, तर कर्णधार मिचेल सॅन्टनरने 35 चेंडूत 43 धावांची झुंज दिली, पण ती संघाला विजय मिळवून देण्यासाठी अपुरी ठरली. भारताकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर अक्षर पटेलने 3 विकेट्स घेत न्यूझीलंडच्या फलंदाजीचा कणा मोडला.
संबंधित बातम्या:



















