Shoaib Akhtar On Virat Kohli: कोहली शतकाच्या जवळ असताना श्रेयस, हार्दिककडून चौकारांवर चौकार; पाकिस्तानच्या शोएब अख्तरने चांगलेच सुनावले!
Shoaib Akhtar On Virat Kohli: विराट कोहलीने (Virat Kohli) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आपल्या एकदिवसीय कारकीर्दमधील 51 वे शतक पूर्ण केले.

Shoaib Akhtar On Virat Kohli: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये (Champions Trophy 2025 Ind vs Pak) भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. दुबईच्या मैदानात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला. पाकिस्तानविरुद्धच्या या विजयासह भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीचं तिकीट पक्कं केलं. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 241 धावा केल्या. या प्रत्युत्तरात भारताने 42.3 षटकांत धावांचा पाठलाग करत सहज विजय मिळवला.
विराट कोहलीने (Virat Kohli) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आपल्या एकदिवसीय कारकीर्दमधील 51 वे शतक पूर्ण केले. या खेळीत त्याने 7 चौकार लगावले. पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीचे हे चौथे शतक होते. पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीचा रेकॉर्ड नेहमीच चांगला राहिलेला आहे. याचदरम्यान भारताच्या विजयावर आणि विराट कोहलीच्या विजयावर पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू शोएब अख्तर याने एक्सवर व्हिडीओ शेअर करत तोंडभरुन कौतुक केले आहे. तसेच विराट कोहली शतकाच्या जवळ असताना चौकार मारणाऱ्या भारतीय खेळाडूंना देखील सुनावले आहे.
शोएब अख्तर नेमकं काय म्हणाला? (Shoaib Akhtar has praised Virat Kohli)
शोएब अख्तर म्हणाला की, जर विराट कोहलीला सांगितले की, तुला पाकिस्तानविरुद्ध सामना खेळायला आहे, तर तो पूर्णपणे तयार होऊनच येतो आणि शतक झळकावून जातो. विराट कोहलीला सलाम...तो एक महान खेळाडू आहे...सध्याच्या उत्तम दर्जाचा खेळाडू आहे...विराट कोहलीने तशी मेहनत देखील केली आहे. विराट कोहली कौतुकाचा मानकरी आहे, विराट कोहली आज एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14 हजार धावांचा टप्पा देखील पार केला. विराट कोहली खरंच खूप चांगला खेळाडू आहे, असं म्हणत शोएब अख्तरने तोंडभरुन कौतुक केले.
चौकार मारणाऱ्या भारतीय खेळाडूंना सुनावले-
विराट कोहलीचा शतकाच्या जवळ असताना आणि भारताला विजयासाठी कमी धावांची आवश्यकता असताना श्रेयस अय्यर आधी दोन चौकार लगावले. श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या मैदानात आला. हार्दिक पांड्याने देखील दोन चौकार लगावले. त्यामुळे विराट कोहलीचे शतक होण्याआधीच भारताचा विजय होईल की काय, असं चाहत्यांना वाटत होतं. भारत जिंकणार होताच, पण विराट कोहलीचे शतक झाल्यास आनंद द्विगुणीत होईल, असा विचार भारतीय चाहते करत होते. त्यामुळे चौकार मारणाऱ्या भारतीय खेळाडूंना देखील शोएब अख्तरने सुनावले. थोडं थांबा..विराट कोहलीला शतक बनवू द्या...कशाला फटके मारत जात होतात, विराट कोहलीसोबत खेळणारे खेळाडू चौकार मारत होते. विराट कोहलीचं माइलस्टोन आहे, असं शोएब अख्तर म्हणाला.
Give him Pakistan and he will come back in form with a match winning 100. #Kohli pic.twitter.com/6eGq048PmF
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) February 23, 2025
16 वर्षांची प्रतीक्षा संपली
विराट कोहली 2009मध्ये पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी खेळला होता. पण या स्पर्धेत विराटने पहिल्यांदाच शतक झळकावले आहे. म्हणजेच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक करण्यासाठी त्याला 16 वर्षे वाट पहावी लागली. त्याच वेळी, 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपनंतर त्याने प्रथमच एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले आहे.





















