BCCI unlikely to allow stars to pick and choose games : इंग्लंडविरुद्धची पाच कसोटीची मालिका संपल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आता खेळाडूंच्या मनमानीवर लगाम घालण्याच्या तयारीत आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे संघात "स्टार कल्चर"च्या विरोधात असून, त्यामुळेच बीसीसीआय एक कडक निर्णय घेण्याच्या विचारात आहे. आता अशा नियमाची आखणी केली जात आहे, ज्यामध्ये खेळाडूंना त्यांच्या मनाप्रमाणे सामने निवडण्याची मुभा राहणार नाही.

‘स्टार कल्चर’वर कात्री; आता गंभीर-आगरकर यांचा टीमवर ठसा

इंग्लंडविरुद्ध मालिका 2-2 अशी बरोबरीत संपल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजीत आगरकर यांचा प्रभाव वाढेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. विशेषतः जसप्रीत बुमराहने 'वर्कलोड मॅनेजमेंट'च्या कारणास्तव दोन सामने खेळले नाहीत, आणि त्याच काळात मोहम्मद सिराजने जबरदस्त कामगिरी करत गंभीरला त्याच्या इच्छेप्रमाणे टीम कल्चर घडवण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे.

बीसीसीआय आणि गंभीरचं 'या' निर्णयावर एकमत बुमराह फक्त तीन कसोटीत खेळले, तर सिराजने पाचही सामन्यांमध्ये भाग घेतला आणि 23 विकेट घेतले. पीटीआयच्या वृत्तानुसार, बीसीसीआय, गंभीर आणि निर्णयप्रक्रियेत सहभागी वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये अशा मनमानीवर बंदी घालण्यासंदर्भात सहमती झाली आहे.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, "हे स्पष्ट सांगण्यात आले आहे की, केंद्रीय करारबद्ध खेळाडूंनी, विशेषतः जे तिन्ही फॉरमॅटमध्ये नियमित खेळतात, त्यांनी भविष्यात त्यांच्या सोयीनुसार सामने निवडण्याचे प्रकरण थांबवावे. यातून असं म्हणायचं नाही की वर्कलोड मॅनेजमेंटकडे दुर्लक्ष होईल. वेगवान गोलंदाजांसाठी ते अत्यावश्यक आहे, पण त्याच्या आडून खेळाडूंनी महत्त्वाचे सामने चुकवावेत, हे खपवून घेतलं जाणार नाही."

सिराजने दिला आदर्श, बुमराहच्या निर्णयावर प्रश्न

सिराजने सर्व पाच सामने खेळून दमदार गोलंदाजी केली, ज्यामुळे त्याच्या फिटनेसची पातळी स्पष्ट झाली. प्रसिद्ध कृष्णा आणि आकाश दीप यांचाही उल्लेख करत अधिकारी म्हणाले की, "मोठमोठ्या स्टार्सपेक्षा खेळ महत्त्वाचा आहे." बुमराह जे दोन सामने खेळला नाही, त्यामध्ये सिराजने जबाबदारी स्वीकारत नेतृत्व केलं.

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स देखील, जरी दुखापतींच्या समस्यांशी झगडत होता, तरीही त्याने चौथ्या कसोटीपर्यंत भरपूर ओव्हर्स टाकल्या. त्यामुळे हे प्रश्‍न उपस्थित होतात की, 'वर्कलोड मॅनेजमेंट' म्हणजे केवळ सोयीचा उपाय तर नाही ना?

बीसीसीआयला बुमराहचे केवळ तीन सामन्यांमध्ये खेळले हे आवडलं नसल्याचेही बोलले जात आहे. यामुळे बंगळुरूतील उत्कृष्टता केंद्रातील ‘स्पोर्ट्स सायन्स’ टीमच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होतोय.  

हे ही वाचा -

Ind vs Eng 5th Test : गंभीरला भिडला, शेवटच्या दिवशी 'ती' चालही खेळली; पण शेवटी त्याचीच चूक नडली, सामना कसा पलटला? मोठं कारण समोर