BCCI Complaint Against Haris Rauf and Sahibzada Farhan : पहलगाव दहशतवादी हल्ल्यानंतर जेव्हा भारत आणि पाकिस्तान संघ आशिया कपमध्ये भिडले, तेव्हापासून वाद थांबण्याचे नाव घेत नाहीत. 14 सप्टेंबरला भारतीय संघाने हस्तांदोलन न केल्याचा मुद्दा पाकिस्तानला इतका खटकला की त्यांनी थेट अंपायरकडे जाऊन मॅच रिफरीकडे तक्रार केली होती. त्यानंतर यूएईविरुद्धच्या सामन्यापूर्वीही त्यांनी रडगाणे गायले. मात्र, पाकिस्तानने सगळ्या मर्यादा 21 सप्टेंबरला ओलांडल्या. जेव्हा भारत-पाकिस्तानमध्ये सुपर-4चा सामना खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंनी उचकवणारे इशारे केले. पण भारतीय खेळाडूंनी आपला संयम गमावला नाही.
हारिस अन् साहिबजादावर होणार कारवाई?
पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहानने भारताविरुद्ध अर्धशतक पूर्ण केल्यावर 'गन सेलिब्रेशन' केले. एवढेच नव्हे तर हारिस रऊफने विमान पाडल्याचा इशारा केला. मैदानावर सीमारेषेजवळ भारतीय फॅन्स त्याला विराट कोहलीचे नाव घेत चिडवत होते, त्यावेळी त्याने हातवारे करून विमान पाडणे आणि ‘6-0’ असे इशारे केले. या दोन्ही खेळाडूंनी जाणीवपूर्वक भारतीय संघ आणि चाहत्यांना उचकवण्याचा प्रयत्न केला.
अखेर बीसीसीआयने अॅक्शन घेतलीच
वृत्तानुसार, बीसीसीआयने मॅच रिफरी अँडी पायकॉफ्ट यांच्याकडे हारिस रऊफ आणि साहिबजादा फरहान यांच्या वर्तनाबाबत तक्रार दाखल केली आहे. भारतीय बोर्डाने या दोघांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलसोबत झालेल्या हारिस रऊफच्या वादावरही आक्षेप नोंदवला आहे. बीसीसीआयच्या मते, पाकिस्तानी खेळाडूंनी हे सर्व मुद्दाम केले असून त्यांना याबद्दल कुठलाही पश्चात्ताप नाही. सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत साहिबजादा फरहानने आपल्या ‘गन सेलिब्रेशन’बद्दल विचारले असता, त्याने स्पष्ट सांगितले की त्याला याचा अजिबात पश्चात्ताप नाही.
दोघांवरही लागणार बंदी?
बीसीसीआय अध्यक्ष आणि आयसीसी अध्यक्ष दोघांच्याही नजरेतून हे प्रकरण लपलेले नाही. नक्वीवर काही कारवाई होईल की नाही हाही भविष्यात संशयाचा विषय आहे. रौफ आणि साहिबजादा दोघांनाही आयसीसीच्या सुनावणीत त्यांच्या कृतींचे स्पष्टीकरण द्यावे लागेल. जर ते त्यांच्या कृतींचे समर्थन करू शकले नाहीत तर त्यांना आचारसंहितेनुसार दंड होऊ शकतो.
हे ही वाचा -