AUS vs BAN डार्विन : आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये आज मोठी घडामोड पाहायला मिळाली. बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात 9 विकेटनं पराभूत करत इतिहास रचला. बांगलादेशकडून तंजीद हसन, हसन महमूद आणि इतर खेळाडूंनी विजयात महत्त्वाचं योगदान दिलं. ऑस्ट्रेलियातील पहिल्या विजयात नजमूल हुसेन शांटोनं केलेलं नेतृत्त्व कौतुकास्पद ठरलं. शांटोच्या नेतृत्त्वात बांगलादेशनं गेल्यानं 6 पैकी 5 कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं बांगलादेश विरुद्ध झालेल्या पराभवाला फलंदाजांना जबाबदार धरलं आहे.
पराभवाचं कारण काय? पॅट कमिन्स म्हणाला...
ऑस्ट्रेलियानं बांगलादेशविरोधातील पहिल्या कसोटीत तगडा संघ उतरवला होता. सर्वश्रेष्ठ टीम घेऊन ऑस्ट्रेलिया मैदानात उतरली होती. मात्र, बांगलादेशनं चार दिवसांमध्ये सामन्यावर पूर्ण वर्चस्व राखलं आणि 9 विकेटनं विजय मिळवला.ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स यानं पराभवाचं खापर फलंदाजांवर फोडलं आहे. पहिल्या दिवशी फलंदाजांनी खराब कामगिरी केल्यानं पराभवाचा पाया रचलेला असं कमिन्सनं म्हटलं.
पॅट कमिन्स पहिल्या कसोटी सामन्यातील पराभावाबाबत बोलताना म्हटलं की, कदाचित पहिल्या दिवसाची कामगिरी सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरला. आम्ही खूप चांगली तयारी केली होती, मात्र, मला कोणतंही कारण सांगायचं नाही, ते खूप चांगलं खेळले. मला वाटतं पहिल्या दिवशी बॉल अपेक्षेपेक्षा अधिक वळत होता, असं कमिन्सनं म्हटलं.
पॅट कमिन्स म्हणाला की टीमनं कठिण स्थिती असली तरी दीर्घकाळ फलंदाजी करत राहण्याचा मार्ग शोधला पाहिजे. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी देखील चांगली कामगिरी केली नाही, असं कमिन्सनं म्हटलं. पहिल्या डावात बांगलादेशच्या खेळाडूंना मोठ्या मोठ्या भागीदारी करण्यापासून आमचे गोलंदाज रोखू शकले नाहीत, असं कमिन्स यानं म्हटलं. बांगलादेशच्या फलंदाजांनी पहिल्या डावात दमदार कामगिरी केली की पॅट कमिन्सला 8 गोलंदाजांचा वापर करावा लागला होता.
बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना 2003 मध्ये झाला होता. त्यानंतर 23 वर्षात दोन्ही संघात ऑस्ट्रेलियामध्ये यापूर्वी 2 सामने झाले होते. अखेर ऑस्ट्रेलियात बांगलादेशनं तिसऱ्या कसोटीत पहिला विजय मिळवला आहे.
बांगलादेश क्रिकेट टीम सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. 2025 नंतर बांगलादेशची कसोटीतील विजयाची टक्केवारी वाढली आहे. 2025 च्या सुरुवातीपासून बांगलादेशनं 10 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी 6 सामन्यात विजय मिळवले आहेत, तर तीन सामन्यात त्यांचा पराभव झाला तर एक सामना अनिर्णीत राहिला.
दरम्यान, दोन सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशनं 1-0 नं आघाडी घेतली आहे. आता दुसरा कसोटी सामना 22 ऑगस्टला होणार आहे.
