दोहा : आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 च्या पहिल्या सेमी फायनलमध्ये बांगलादेश अ संघानं भारत अ संघाला पराभूत केलं. बांगलादेश या विजयासह अंतिम फेरीत दाखल झाला. जितेश शर्माच्या नेतृत्त्वात भारताच्या गोलंदाजांना दमदार कामगिरी करता आली नाही. बांगलादेशनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 6 बाद 194 धावा केल्या. तर, वैभव सूर्यवंशी आणि प्रियांश आर्य या दोघांनी चांगली सुरुवात करुन देखील भारताला विजय मिळवता आला नाही. अखेरच्या बॉलवर चार धावांची गरज असताना भारतानं तीन धावा घेत मॅच सुपर ओव्हरमध्ये नेली. तिथ भारताचा पराभव झाला. भारताचे दोन्ही फलंदाजी शुन्यावर बाद झाले. बांगलादेशच्या देखील फलंदाजांनी एकही धाव केली नाही. सुयश शर्मानं वाईड बॉल टाकल्यानं बांगलादेशचा विजय झाला.
सुपर ओव्हरमध्ये बांगलादेशचा विजय
आयसीसीच्या नियमानुसार जो संघ पहिल्यांदा फलंदाजी करतो त्यानं सुपर ओव्हरमध्ये दुसऱ्यांदा फलंदाजी करायची असते. यामुळं भारताला पहिल्यांदा फलंदाजी करावी लागली. भारताकडून जितेश शर्मा, रमण दीप फलंदाजीला आले होते. जितेश शर्मा पहिल्याच बॉलवर बाद झाला. यानंतर फलंदाजीला आलेला आशुतोष शर्मा देखील बाद झाला. यामुळं बांगलादेशला विजयासाठी 1 रन करायची होती. सुयश शर्मानं बांगलादेशच्या यासीर अली याला पहिल्या बॉलवर बाद केलं. मात्र, त्यानंतर दुसरा बॉल त्यानं वाईड टाकला. यामुळं भारताचा पराभव झाला. सुपर ओव्हरमध्ये फलंदाजाच्या नावावर मात्र एकाही रनची नोंद झाली नाही.
सुपर ओव्हरमध्ये भारताकडून सुयश शर्माला संधी देण्यात आली. सुयश शर्मानं पहिल्याच बॉलवर यासीर अलीची विकेट घेत चांगली सुरुवात केली.यानंतर बांगलादेशचा कॅप्टन अकबर अली मैदानावर आला. सुयश शर्मानं वाईड बॉल टाकला. याची एक रन बांगलादेशला मिळाली अन् कोणत्याही फलंदाजानं रन न करता त्यांचा विजय झाला.
दरम्यान, आशिया कप रायझिंग स्टार्समधून भारत स्पर्धेबाहेर गेला आहे. बांगलादेशनं अंतिम फेरीत धडक दिली आहे. आता श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात दुसरी सेमी फायनल सुरु आहे. या मॅचमध्ये जो संघ विजयी होईल त्यांची लढत बांगलादेश सोबत होईल.