दोहा : दोहामध्ये सुरु असलेल्या आशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या लढतीत पाकिस्तान अ आणि बांगलादेशयांच्यातील मॅच ड्रॉ झाली. त्यामुळं मॅचचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. बांगलादेशचा संघ सुपर ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये 6 धावा करु शकला. पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी 7 धावा करायच्या होत्या. पाकिस्तानच्या मसूद आणि सदाकत या दोघांनी 7 धावा करत संघाला आशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेचं विजेतेपद मिळवून दिलं.

बांगलादेशची फलंदाजी सुपर ओव्हर :

पाकिस्तानकडून सुपर ओव्हरमध्ये अहमद डॅनियलनं गोलंदाजी केली.

पहिला बॉल : 1 रन

दुसरा बॉल :  सकलेन झेलबाद 

तिसरा बॉल : वाईड आणि चार धावा

तिसरा बॉल : जिशान बाद

पाकिस्तानची फलंदाजी सुपर ओव्हर :

बांगलादेशकडून रिपोन मोंडोल यानं सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी केली. 

पहिला बॉल : 1 रन

दुसरा बॉल :  1 रन 

तिसरा बॉल :  मसूदचा चौकार

चौथा बॉल :   1 रन

पाकिस्ताननं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 125 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना बांगलादेशनं 20 ओव्हरमध्ये 9 बाद 125 धावा केल्या.

पाकिस्ताननं पहिल्यांदा फलंदाजी करताना 125 धावा केल्या. माझ सदाकत यानं 23, अराफत मजन्हास यानं 25 आणि साद मसूद यानं 38 धावा केल्या. पाकिस्तानचे इतर फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकले नाहीत. बांगलादेशच्या रिपोन मोंडोल यानं 3, रकिबूल हसन यानं 2 विकेट घेतल्या.

पाकिस्तानच्या 125 धावसंख्येचा पाठलाग करताना बांगलादेशकडून हबिबूर रहमान सोहन यानं 26 धावा, एसएम मेहराब यानं 19, रकिबूल हसन यानं 24 धावा केल्या. अब्दुल सकलेन यानं 16 धावा आणि रिपोन मोंडोल यानं 11 धावा या दोघांनी 31 धावांची भागीदारी केल्यानं बांगलादेशनं 20 ओव्हरमध्ये 9 बाद 125 धावा केल्या. भारताविरुद्ध 20 ओव्हरमध्ये 195 धावांचा डोंगर उभा करणाऱ्या बांगलादेशला फायनलमध्ये 125 धावांचं आव्हान पार करताना नाकीनऊ आलं, अखेर मॅचचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. 

आशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये बांगलादेशनं भारताला सुपर ओव्हरमध्ये पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील फायनलचा निकाल देखील सुपर ओव्हरमध्ये निश्चित झाला. 

दरम्यान, आशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेत भारताच्या संघाचं आव्हान सेमी फायनलमध्ये संपुष्टात आलं होतं. जितेश शर्माच्या नेतृत्त्वातील भारतीय संघाला बांगलादेशकडून उपांत्य फेरीच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला होता.